नागपूर : जागतिक व्याघ्रदिनी देशातील व्याघ्रगणनेची आकडेवारी जाहीर होणार या प्रतीक्षेत असणाऱ्यांना केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने धक्का दिला आहे. ही आकडेवारी २९ जुलैला जाहीर होणार नाही. ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे व्याघ्रगणनेची आकडेवारी जागतिक व्याघ्रदिनी जाहीर करण्याची परंपरा यावेळी पहिल्यांदा खंडित होणार आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या माध्यमातून देशभरातील व्याघ्रप्रकल्प, अभयारण्यात वैज्ञानिक पद्धतीने व्याघ्रगणना केली जाते. त्यासाठी डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेची मदत घेतली जाते. २०१८ मध्ये शेवटची गणना झाली तेव्हा भारतातील वाघांची संख्या २.९६७ इतकी होती. २०१० साली सेंट पिटर्सबर्ग येथे आयोजित जागतिक व्याघ्र शिखर परिषदेत भारताने वाघांची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प केला होता. तो २०२२च्या गणनेपूर्वीच पूर्ण केल्यामुळे यावर्षीच्या वाघाच्या आकडेवारीकडे भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या होत्या. मात्र, यावेळी पहिल्यांदाच जागतिक व्याघ्रदिनी वाघांची आकडेवारी जाहीर करण्याची परंपरा खंडित होणार आहे. देशभरातील वाघांची गणना झाल्यानंतरही त्याचे मूल्यांकन अजून पूर्ण व्हायचे आहे. त्यामुळे त्यात अचूकता आल्यानंतरच व्याघ्रगणनेचा अहवाल जाहीर केला जाईल, असे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. यंदाचा जागतिक व्याघ्र दिन चंद्रपुरात येत्या २९ जुलैला जागतिक व्याघ्र दिनानिमित्त चंद्रपूर येथील वनअकादमीत राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्यावतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने केंद्रीय पर्यावरणमंत्री पहिल्यांदाच चंद्रपूर जिल्ह्यात येत आहेत. यादिवशी वनअकादमीत भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. सकाळी दहा ते साडेअकरा या वेळेत जागतिक व्याघ्रदिनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाचा पारितोषिक वितरण सोहोळा तसेच देशभरातील व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांची बैठक, विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या जवानांचे संचलन सादर होणार आहे.