नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडे यजमानपद असलेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसचा शनिवारी समारोप झाला. विज्ञान काँग्रेसमध्ये सहभाही झालेल्यांना कोऱ्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे एकीकडे आयोजकांनी नावासह प्रमाणपत्र न दिल्याने नाराजी तर दुसरीकडे अशा प्रमाणपत्रांचा गैरवापर होण्याची शक्यताही आहे. विद्यापीठामध्ये आयोजित विज्ञान काँग्रेसचे नियोजन हा सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय राहिला आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी संशोधक, विद्यार्थी आणि प्राध्यापकांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक होते. हेही वाचा >>> शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत कॉंग्रेसच्या निर्णयाआधीच ठाकरे गटाच्या उमेदवाराचा अर्ज नोंदणी केलेल्यांनाच सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार होते. समारोपाच्या एका दिवसाआधीपासून विद्यापीठाने प्रमाणपत्रांचे वाटप सुरू केले. मात्र, हे प्रमाणपत्र वाटप करताना त्यावर नोंदणी केलेल्या उमेदवाराच्या नावाचा कुठलाही उल्लेख नव्हता. केवळ प्रमाणपत्र घ्या नंतर तुमच्या हाताने नाव लिहा, असे सांगण्यात आले. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. शिवाय अशा कोऱ्या प्रमाणपत्रांचा गैरवापर होण्याची शक्यताही आहे. यासंदर्भात ॲड. मनमोहन वाजपेयी यांनी कुलगुरूंना पत्र लिहून यावर आक्षेप घेतला आहे. तसेच या प्रकाराची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.