डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून कार्य करणाऱ्या संस्थेच्यावतीने साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात देण्यात आलेल्या या पुरस्काराचे मोल मोठे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत सुधाकर गायकवाड यांनी व्यक्त केले. आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अॅन्ड लिटरेचर या संस्थेच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां प्रा. कुमुदताई पावडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय डॉ. बी रंगराव यांना ‘वसंत मून संशोधन पुरस्कार’, ई.झेड. खोब्रागडे यांना त्यांच्या पुस्तकासाठी ‘दया पवार आत्मकथन पुरस्कार’, प्रा. रवीचंद्र हडसनकर यांना ‘नामदेव ढसाळ काव्य पुरस्कार’, सुदाम सोनुले यांना ‘बाबुराव बागुल कथा पुरस्कार’, डॉ. ईस्वर नंदापुरे यांना ‘अश्वघोष नाटय़ पुरस्कार’ आणि डॉ. पुरनसिंह यांना ‘भगवानदास हिंदी साहित्य पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. सध्याची लोकशाही डॉ. आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या विचाराशी विसंगत आहे. लोकशाहीमध्ये समाजातील खालच्या स्तरातील व्यक्तीला सन्मान मिळाला पाहिजे हा विचार बाबासाहेबांनी मांडला, असे गायकवाड म्हणाले. संचालन मच्छिद्र चोरमारे यांनी केले. पुरस्काराची रक्कम जनमंचला ज्यांच्या विचारातून प्रेरणा घेत आयुष्यभर काम करीत आहे, अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्यामुळे आनंद झाला. या पुरस्काराची दहा हजार रुपयाची रक्कम सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या ‘जनमंच’ या संस्थेला शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी देणार आहे, असे कुमुदताई पावडे यांनी जाहीर केले. नागपूर शहरात असलेले आनंदनगर या वस्तीमध्ये राहत असल्यामुळे स्वतला धन्य समजते. ती खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांवर श्रद्धा ठेवणाऱ्यांची कर्मभूमी आहे. चळवळीचे ते खरे केंद्र आहे. संस्कृत या विषयाचा अभ्यास सुरू केला तो केवळ बाबासाहेबांच्या प्रेरणेतून केला आहे. त्यानंतर समाजात आंतरजातीय विवाह या विषयावर काम केले आणि त्या माध्यमातून अनेकांचे संसार थाटले. अनेकदा टीका आणि धमक्या आल्या मात्र निर्धार पक्का असल्यामुळे काम करु शकले. गंगाधार पानतावणे,ड. वि.भि. कोलते आणि ग.त्र्य माडखोलकर यांच्या प्रोत्साहनामुळे साहित्य लेखन करु शकले, असेही कुमुदताई म्हणाल्या.