साहित्य संमेलनात सहभागी होणारे फक्त संमेलनाचे भाडे वसूल करतात, नंतर ते तिकडे फिरकतही नाही. संमेलनातील परिसंवादात ते वक्तृत्त्वाचे प्रदर्शन करतात. कारण त्यांना टाळ्या मिळवायच्या असतात. परंतु, त्यांच्या भाषणांनी रसिकश्रोते, वाचकांना कोणते नवे विचार मिळतात, संमेलनातील अध्यक्ष कोणता नवा विचार देतात, अशा परखड प्रश्नांची सरबत्ती ज्येष्ठ काव्य समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दीवर्षानिमित्त आयोजित ‘संवादाचा सुवावो’ या अनुभवसिद्ध वाङ्मयीन वार्तालापाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या प्रश्नांवर डॉ. सुधीर रसाळ बोलत होते. साहित्य निर्माण होत आहे, पण त्याच्याशी नाते शिल्लक नाही. जे साहित्याबाबत घडत आहे तेच समीक्षणाबाबतही घडत आहे. समीक्षकांना नेमके काय म्हणायचे आहे तेच कळत नाही, हे सांगताना डॉ. रसाळांनी काही उदाहरणे वाचून दाखवली.
वाचक अभिरुचीसंपन्न होण्यासाठी आपण काय केले या न्या. चपळगावकरांच्या प्रश्नांवर त्यांनी अलीकडच्या साहित्य संमेलनांवर चांगलेच कोरडे ओढले. यावेळी त्यांनी मराठी भाषा, मराठी वाङ्मय संस्कृती, आस्वादक समीक्षेने मराठीत माजवलेला गोंधळ अशा अनेक विषयांवर स्पष्ट मते मांडली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही भोगण्याची गोष्ट आहे, ती मागण्याची गोष्ट नाही.

हेही वाचा : नागपूर : अश्लील छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देत वकिलाचा महिलेवर बलात्कार

सरकारने ते द्यावे किंवा न द्यावे, पण लेखकाने ते वापरले पाहिजे. जेव्हा जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरुन खटले भरले गेले तेव्हा तेव्हा शरणागती पत्करणारे पाहायला मिळाले. मर्ढेकरांवर हा खटला भरला गेला तेव्हा त्यांना कुणीही साथ दिली नाही, अशी आठवणही डॉ. रसाळ यांनी सांगितली.लेखकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अस्तित्त्व टिकवण्यासाठी अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक प्रकाश एदलाबादकर यांनी केले. विवेक अलोणी यांनी आभार मानले. यावेळी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, न्या. विकास सिरपूरकर, विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी समितीचे संरक्षक डॉ. पिनाक दंदे उपस्थित होते.

हेही वाचा : कुनोतील चित्ता प्रकल्पाचे १७ सप्टेंबरला उद्घाटन; पहिल्या टप्प्यात पाच नर आणि तीन माद्यांसाठी उद्यानात व्यवस्था

काही कविता वाचून दाखवत कवींनीच वाचकवर्ग कसा गमावला हे डॉ. रसाळांनी ज्या शैलीत सांगितले, ते पाहून श्रोत्यांमध्ये हास्याचे कारंजे उडाले. दरवर्षी इतके कवितासंग्रह कसे प्रकाशित होतात, या चपळगावकरांच्या प्रश्नावर रसाळ म्हणाले, कवी हे प्राध्यापक, मध्यमवर्गीय लाखोंचा पगार घेणारे असता. त्यामुळे स्वखर्चाने ते कवितासंग्रह घेतात, नाटकांच्या बाबतीत बोलताना रसाळ म्हणाले की, महेश एलकुंचवार यांच्यानंतर नवा नाटककार निर्माणच झाला नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr sudhir rasal said many literary comes in summit only collect the rent in nagpur tmb 01
First published on: 11-09-2022 at 10:39 IST