महाविकास आघाडीची सत्ता असताना महापालिकेला निधी मिळत नाही, अशी ओरड करणारे भाजप नेते आता राज्यात पक्षाची सत्ता असूनही निधीअभावी महापालिकेचे अनेक प्रकल्प रखडले असताना गप्प बसले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे रखडलेल्या अनेक प्रकल्पांमध्ये भाजप नेते व माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी घोषित केलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे. महापालिकेत प्रशासकीय राजवटीला जवळपास ९ महिने झाले आहेत. शहर स्वच्छता अंतर्गत अनेक प्रकल्प मार्गी लावले जात असले तरी तिवारी यांनी सुरू केलेले अनेक प्रकल्प आजही प्रलंबित आहेत, काही प्रकल्पासाठी निधी नसल्याने ते मार्गी लागलेले नाही. महाविकास आघाडी सरकार असताना भाजप नेते महापालिकेला जाणीवपूर्वक निधी दिला जात नसल्याचा आरोप करीत होते. आठ महिन्यांपासून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे. तरी अनेक प्रकल्प निधी नसल्यामुळे रखडले आहेत. अजूनही महापालिका प्रशासनाला ५०० कोटींच्यावर देणी बाकी असून उत्पन्नाचा स्त्रोत कमी झाला आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने आता कडक मोहीम हाती घेतली आहे. तरी चोवीस तास पाणीपुरवठा प्रकल्प अद्याप पूर्ण होऊ शकला नाही. सिमेंट रस्त्यांची कामे, भांडेवाडीतील प्रकल्प अर्धवट आहे. डांबरी रस्त्याचा प्रश्न कायमच आहे. रस्त्याच्या कामासाठी महापालिकेने ३२ कोटी मंजूर केले होते. ही कामे सुरू झाली नाही. विविध भागात ७५ रुग्णालये, मैदाने, उद्याने विकसित करण्यात येणार होती. ऑरेंज सिटी प्रकल्प, साई क्रीडा केंद्र, कचऱ्यापासून विद्युत निर्मिती प्रकल्प, जलशुद्धीकरण प्रकल्प, बीओटी तत्त्वावर महालातील व सक्करदरातील बुधवार बाजार, कमाल चौक येथील व्यापारी संकुल, भूमिगत गटार योजना, प्रधानमंत्री आवास योजना, घरकूल आणि अंबाझरी ओपन थिएटर, जरीपटका मार्केट, सोख्ता भवनमध्ये व्यापारी संकुल, महिला उद्योजिका भवन, शहरातील चित्रकार, शिल्पकारासाठी कलानगराची निर्मिती व आर्ट गॅलरी आदी प्रकल्प अजूनही केवळ कागदावर आहेत. महापालिका निवडणुका केव्हा होतील याबाबत अनिश्चितता असल्यामुळे माजी नगरसेवक या विषयावर काहीच बोलत नाही. पूर्वी प्रत्येक प्रकल्पासंदर्भात दर पंधरा दिवसंनी आढावा घेतला जात असे. आता मात्र बैठकी होत नाही आणि कामाचा आढावा घेतला जात नसल्याचे समोर आले आहे. प्रकल्प कागदावरच७५ वंदेमातरम् प्राथमिक रुग्णालय (हेल्थ पोस्ट )माजी खासदार स्व.अनसूयाबाई काळे समुपदेशन केंद्रअतिक्रमणमुक्त फुटपाथई हॉकर्स धोरण७५ स्मार्ट उद्यानसुपर ३० च्या धर्तीवर सुपर ७५जनावरांसाठी वाठोडा परिसरात नंदग्रामज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिकेत कक्षस्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्रबिरसानगरमध्ये गणिती उद्याानबाळासाहेब ठाकरे स्मृती शैक्षणिक कला क्रीडा प्रकल्पमहिला उद्योजकांसाठी बाजारपेठडिजिटल वाचनालयमहापालिकेसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासनाच्या हाती सूत्रे आली. पण, त्यांच्या काळात जुन्या प्रकल्पाचा आढावा घेतला जात नाही. ७५ रुग्णालये, वंदे मातरम उद्यानासह काही योजना मार्गी लागलेल्या आहे.-दयाशंकर तिवारी, माजी महापौर