लोकसत्ता टीम

वर्धा : वर्धा जिल्हा हा तेली समाजाचा बालेकिल्ला समजल्या जातो. माजी मंत्री प्रमोदबाबू शेंडे यांनी ८० च्या दशकात याची बांधणी केली. त्यांच्या पश्चात या किल्ल्यावर खासदार रामदास तडस हे आरूढ झाले. त्यांच्याकडून आता जिल्ह्यातील तेली समाज बांधवांना समाज भवन बांधून देण्याची अपेक्षा आहे. मात्र गेल्या पाच वर्षापासून जागेअभावी हे काम अडल्याचे खासदार म्हणतात. त्याचा समाचार शेखर प्रमोद शेंडे यांनी घेतला. श्री संताजी जगनाडे महाराज फाउंडेशनतर्फे पाचव्या राज्यस्तरीय सर्व शाखीय तेली समाज उपवर वधू व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजाचे झाडून सर्व मान्यवर हजर झाले. यात शेंडे यांनी हा मुद्दा छेडला.

ते म्हणाले, वर्ध्यात तेली समाज भवन व्हावे ही प्रत्येकाची इच्छा आहे. खासदार रामदास तडस पाच वर्षापासून जागेचे निमित्त सांगतात. पण मी जाहीरपणे सांगतो की मला निवडून द्या, मी जागा देतो. इंदिरा सूतगिरणीची मोठी जागा आहे. त्यातील पाच एकर जागा शासन नियमानुसार बदल करीत समाजासाठी देतो. प्रवीण हिवरे हे यासाठी अपेक्षित कार्यवाही पूर्ण करतील. पण मला निवडून तर द्या. समाजानेही एकाच्याच मागे धावणे सोडले पाहिजे, आमचाही विचार करावा. तरच सर्व प्रगती शक्य होईल, असे शेंडे रोखठोक बोलले अन् टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

आणखी वाचा-सर्वत्र भाजपची सत्ता असताना पराभव झालाच कसा? महायुतीच्या मेळाव्यात मुनगंटीवार यांच्या समक्ष अहीर यांचा सवाल

हा मुद्दा एवढा जिव्हाळ्याचा की पुढील वक्त्यांनी पण त्याचीच री ओढली. खासदार रामदास तडस यांनीही हा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, माझी सर्व ते सहकार्य करण्याची तयारी आहे. जागा आल्याबरोबर मी दानदाते मिळवून देतो. चिंता करू नका. समाज भवनासाठी सर्वपक्षीय नेत्यांची एकजूट आवश्यक आहे. शेंडे यांनी चिंता सोडावी. त्यांचेही चांगले दिवस अपेक्षित आहे, असे खासदार हसत हसत म्हणाले आणि पुन्हा टाळ्या पडल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीर चाफले यांनी उपक्रमांची माहिती दिली. अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील नागपूर, आमदार रामदास आंबटकर, माजी आमदार राजू तिमांडे, माजी नगराध्यक्ष अतुल तराले, मुख्याधिकारी राजेश भगत, शिवसेना नेते रविकांत बालपांडे, नगराध्यक्ष स्नेहल देवतरे, उद्योजक संघाचे प्रवीण हिवरे, माजी नगराध्यक्ष शोभा तडस प्रामुख्याने उपस्थित होते. प्रीती वाडीभस्मे, गीता गवते यांनी संचालन केले. आयोजनात किशोर गुजरकर, विजय घवघवे, अतुल पिसे, नीळकंठ पिसे, मोहन गुल्हणे, योगेश साहू, प्रवीण वासेकर, चित्रा चाफले, वैशाली गुजरकर, विपीन पिसे, राजू ढोबळे, आशिष पोहाने, सतीश इखार आदींनी योगदान दिले.