नागपूर : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राबरोबरच अनेक उद्योग महाराष्ट्रातून गुजरातमध्ये पळविण्यात येत असल्याचे आरोप-प्रत्यारोप नेहमीच होतात़. आता महाराष्ट्रातून हत्ती गुजरातमध्ये पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची बाब समोर आली आह़े त्यास वन्यप्रेमींचा तीव्र विरोध सुरू आह़े. गुजरातच्या जामनगर भागात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून सुमारे २५० एकर जागेत खासगी प्राणिसंग्रहालय उभारण्यात येत आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने १२ फेब्रुवारी २०१९ ला रिलायन्सच्या या प्राणिसंग्रहालयास मंजुरी दिली़ या प्राणिसंग्रहालयात देशभरातील विविध ठिकाणचे दुर्मीळ प्राणी नेण्यात येणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथील हत्ती शिबीर हे राज्यातील एकमेव पाळीव हत्तीचे शिबीर आहे. या शिबिरात सध्या सात हत्ती असून, त्यापैकी चार तसेच आलापल्ली येथील तीन असे एकूण सात हत्ती गुजरातला पाठविण्यात येणार आहेत़ ओडिशासारख्या राज्यातून आलेल्या हत्तीच्या कळपाला महाराष्ट्रातील याच जिल्ह्याने आश्रय दिला असताना येथील हत्ती बाहेर पाठवण्यास वन्यजीवप्रेमींनी तीव्र विरोध केला आहे. राज्याच्या वनखात्याकडे ताडोबा-अंधारी, मेळघाट या व्याघ्रप्रकल्पात हत्ती आहेत. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर आणि आलापल्ली येथेही हत्ती आहेत. मात्र, कमलापूर येथील हत्तीच्या पालनपोषणासाठी शासनाकडून वेळेवर निधी मिळत नाही. एका हत्तीमागे एक माहूत आणि एक चाराकटर आवश्यक असताना मनुष्यबळाची कमतरता आहे. एका कंत्राटी पशुवैद्यकाच्या बळावर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प आणि हत्ती शिबिराची जबाबदारी सांभाळली जात आहे. गेल्या दोन वर्षांत हत्तीची तीन पिल्ले आजाराने मृत पावली. हत्ती शिबिरात असणाऱ्या सातपैकी चार हत्ती आणि आलापल्ली येथील तीनपैकी तीनही हत्ती स्थलांतरित करण्यात येत असल्याने वन्यजीवप्रेमींसह सारेच आक्रमक झाले आहेत. त्यासाठी ‘कमलापूर वाचवा’ अशी स्वाक्षरी मोहीम सुरू झाली असून या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र अहेरी तालुक्यातील कमलापूर वनपरिक्षेत्रात १९६२ मध्ये लाकूड वाहतुकीसाठी बसंती आणि महािलगा या दोन हत्तींना आणले होते. त्यावेळी हे हत्ती कमलापूरपासून १४ किलोमीटर अंतरावरील कोलामार्का येथील जंगलात होते. या जंगलात हत्तींसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने कमलापूरपासून चार किलोमीटरवरील परिसरात त्यांना आणण्यात आले. त्यानंतर हळूहळू येथे हत्तीची संख्या वाढली. नक्षलग्रस्त भागात असूनही पर्यटकांसाठी हे हत्ती शिबीर नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.