वर्धा: पत्नी मरण पावली तर पतीचा पुन्हा विवाह करून देण्याची मानसिकता ठेवणारा समाज पतीचे निधन झाल्यास पत्नीचा नव्याने संसार थाटून देण्यास कच खात असल्याचे चित्र आजही समाजात दिसून येते. विधवा पुर्नविवाह हा कधी काळी सामाजिक सुधारणेचा मोठा भाग राहिला. त्यास शतक लोटत आहे पण आजही असा विवाह लावून देण्यास विरोध होत असल्याचे हे उदाहरण. त्यात विधवा महिलेचा पुन्हा विवाह नकोच, असा विरोध केवळ सासर मंडळीचाच नव्हे तर जन्मदात्या आईवडिलांचा पण. पण त्यावर मात करीत हा विवाह संपन्न झाला.
समाजाच्या साक्षीने प्रिया बाळबुधे ही लग्नानंतर प्रिया वानखेडे झाली. मात्र दोन मुलं झाल्यानंतर तिच्या पतीचे निधन झाले. मात्र तरीही नं खचता प्रियाने अंगणवाडीची नौकरी स्वीकारून जीवन नव्याने सूरू केले. दोन मुलांचा सांभाळ आता आपल्यालाच करायचा ही भावना. पुढे गावातीलच योगेश राऊत या युवकाशी ओळख झाली. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. योगेश हा राष्ट्रीय युवा संघटनेचा तालमीत तयार झालेला सुधारणावादी विचाराचा. दोघात घट्ट प्रेम रुजले. एकत्र आयुष्य जगायचे हा निर्धार झाला.
मात्र चालीरिती, प्रथा याचा अडसर सूरू झाला. दोघांनी विवाह करण्याचा निर्णय जाहीर केला. तो ऐकताच प्रियास सासरच्या मंडळींनी विरोध दर्शवीला. त्यातच तिच्या आईवडिलांनी पण संमती नाकारली. एव्हढेच काय तर तिला धमक्या देणे सूरू झाले. मानसिक छळ होत होताच. त्यात ती खचून जाऊ लागली. मुलांच्या भविष्यासाठी विधुराचे लग्न लावून देण्याची भूमिका विधवा महिलेबाबत कां घेतली जात नाही, असा प्रश्न करण्यात आला. विवाहास तयार योगेश हा उच्चशिक्षित, नोकरदार व घरी शेती असलेला म्हणून आदर्श स्थळ. त्याने विधवेशी विवाह करावा, ही बाब घरच्यांना पचत नव्हती. गाव सोडून जावे, इथपर्यंत जाच वाढला. शेवटी त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सचिव गजेंद्र सुरकार यांची भेट घेत व्यथा मांडली.
योगेश व प्रियाचे समुदेशन करण्यात आले. दोघांची हिंमत वाढली. कुटुंब व समाजाचा विरोध झुगारून विवाह करायचाच असा निर्धार पक्का झालं. २ मे रोजीचा मुहूर्त ठरला. या प्रकरणी कायदेशीर बाबी जिल्हा विवेक वाहिनीच्या डॉ. मंजुषा देशमुख व मानसिक आरोग्य विभागाचे दिलीप गुळघाणे यांनी सांभाळल्या. वर्धा वर्धनच्या सभागृहात सत्यशोधकी पद्धतीने विवाह संपन्न झाला. सुटकेचा निश्वास सुटला. यावेळी दारूबंदी चळवळीचे भाई रजनीकांत, समता दलाचे गौतम देशभ्रतार, राष्ट्र सेवा दलाचे मोहन खैरकार, गजेंद्र सुरकार, गुड्डु देशमुख, फुलमाळी, दिनेश प्रसाद, अक्षय काटपातळ तसेच महाराष्ट्र अनिसचे पदाधिकारी प्रामुख्याने हजर होते.