नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने बांधलेला बुटीबोरी उड्डाण पुलास साडेतीन वर्षांतच तड गेल्याने सहा महिन्यांपासून त्यावर वाहतूक बंद आहे.या पुलाची दुरुस्तीच्या कामाला एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. दुरुस्तीनंतर आता हा पूल १२ मे पासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या गृहजिल्ह्यातील बुटीबोरी उड्डाण पुलास काही वर्षांत तडे गेल्याने एनएचएआयचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.गडकरीचे खाते देशभरात उच्च दर्जाच्या पुलांची बांधणी करते. नागपूरपासून अवघ्या २१ किलोमीटवर असलेला बुटृटीबोरी उड्डाण पुलास अल्पवाधीत तडे गेल्याने टीका केली जात होती. परंतु कॅन्टीलिव्हरून जडवाहन गेल्याने पुलास तडे गेल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर टी अँड टी कंत्राट कंपनीला या पुलाची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रारंभी तीन महिन्यात या पुलाची दुरुस्ती होईल, असे सांगण्यात आले. परंतु दुरुस्तीची मुदत आणखी तीन महिन्यांनी वाढवण्यात आली. त्यानुसार १२ मे पासून हा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे एनएचएआयचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नागपूर-चंद्रपूर-वर्धा मार्गाला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील बुटीबोरी येथील उड्डाणपुलाला २४ डिसेंबर रोजी तडे गेले होते. पुलाच्या कॅटीलिव्हरवरून जड वाहन गेल्याने ११ ठिकाणचा पुलाखालील सिमेंटचा भाग तुटला. राष्ट्रीय महामार्गावरील बुटीबोरी उड्डाण पूल नादुुरुस्त झाल्याने हैदराबाद ते नागपूर, यवतमाळ, वर्धा ते नागपूर दरम्यानची वाहतूक बुटीबोरी शहर आणि औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या चौकातून वळवण्यात आली. त्यामुळे या चौकात वाहतुकीची कोंडी होत आहे. व्हीएनआयटीच्या तज्ञांकडून या पुलाची तपासणी करण्यात आली. तज्ञाच्या चमूने केलेल्या मार्गदर्शनानंतर या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दरम्यानच्या काळात या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली होती. बेंगळुरू येथील ‘स्ट्रक्चरल एजन्सी’कडून हे काम करण्यात आले. ‘हायस्ट्रेंथ इपोक्सी ग्राउट’ पद्धतीने पुलाला मजबुती देण्यात आली. त्यावर ‘कार्बन लेमिनेशन आणि कार्बन रॅप्स’ लावण्यात येत आहे. यामुळे तड गेलेला हा पूल मजबूत होईल, असा विश्वास संबंधित कंत्राटदार कंपनीने व्यक्त केला.
विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना याच मार्गान जावे लागते. हा अतिशय वर्दळीचा मार्ग पाच महिन्यांपासून बंद आहे. वाहतूक बुटीबोरीच्या मुख्य चौकातून वळवण्यात आली आणि वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे. कामाला गती द्या, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. अखेर हे काम पूर्ण झाल्याने ही प्रतीक्षा आता संपणार आहे.