नागपूर/ नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानात सुरू असलेल्या हवाई धुमश्चक्रीत समाजमाध्यमांवरही खोट्या माहितीचा धुमाकूळ सुरू झाला आहे. ‘हल्ल्याची दृश्ये’ असल्याचे सांगत जुन्या युद्धांच्या चित्रफिती, गेममधील दृश्ये, चित्रपट दृश्ये प्रसारित केली जात आहेत. दुसरीकडे, अनेक वृत्तवाहिन्यांकडूनही माहितीची पडताळणी न करता अतिशयोक्ती ‘ब्रेकिंग न्यूज’चा भडिमार सुरू झाल्याने गोंधळात भर पडत आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ फत्ते झाल्यापासूनच समाजमाध्यमांवर ‘युद्धज्वर’ चढला असून या मोहिमेच्या म्हणून भलत्याच घटनांच्या चित्रफिती प्रसारित करण्यात येत आहेत. त्यातच गेले दोन दिवस पाकिस्तानकडून होणारे हल्ले आणि त्याला भारताने दिलेले चोख प्रत्युत्तर या घडामोडींच्या नावाखाली भ्रामक आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवण्यात येत आहे. गुरुवारी रात्री पाकिस्तानने जम्मू, जैसलमेर, राजौरी या भागांवर केलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले भारतीय सैन्य दलाने हाणून पाडले. मात्र, त्यानंतर अनेक वृत्तवाहिन्यांवरून ‘करारा जबाब’च्या नावाखाली ‘कराची बंदर उद्ध्वस्त’ ,‘पाकिस्तानच्या शहरांवर हल्ले’,नौदलाकडूनही आक्रमण अशा स्वरुपाच्या ‘ब्रेकिंग न्यूज’ चालवण्यात आल्या. प्रत्यक्षात भारताकडून यापैकी एकही अधिकृत पुष्टी करण्यात आली नाही.

यापैकी अनेक वृत्तवाहिन्यांनी समाजमाध्यमांवरून प्रसारित होणाऱ्या माहितीची खातरजमा न करता त्याआधारे बातम्या दिल्याचेही दिसून आले. समाजमाध्यमांवर तर अशा खोट्या माहितीचा धुमाकूळ सुरू आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस समूहाच्या लाईटहाऊस जर्नालिझमच्या ‘फॅक्टचेकर’ अंकिता देशकर यांनी केलेलया पडताळणीत अशा अनेक खोट्या चित्रफिती आणि छायाचित्रांचा उलगडा झाला. ‘रिपोर्ट काश्मीर’ नावाने खाते असलेल्या एका व्यक्तीने पाकिस्तानने भारताचे राफेल विमान पाडल्याचे छायाचित्र प्रसारीत केले होते. प्रत्यक्षात ते २०२१मधील एका वृत्तातील छायाचित्र असल्याचे उघड झाले. ‘जॅक’ या नावाच्या खात्यावरून इन्स्ट्राग्राम वापरणाऱ्याने रात्रीच्या आकाशात होत असलेल्या अग्णिबाणांच्या वर्षावाची चित्रफित ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणून प्रसारीत केली. ती प्रसारमाध्यमांनीही दाखवली. प्रत्यक्षात ती इराणच्या क्षेपणास्त्रांनी नेगेव वाळवंटातील हवाई तळावर केलेल्या हल्ल्याची होती. मोहित कमाल रथ यांनी ‘एक्स’वर शुक्रवारी एक चित्रफीत सामाईक केली. त्याला भारतीय नौदलाने पाकिस्तानचे कराची बंदर उद्ध्वस्त केले, असे शीर्षक दिले. तिची पडताळणी केल्यानंतर ही चित्रफीत फिलाडेल्फिया विमान अपघाताची असल्याचे स्पष्ट झाले. इस्रायलमधील युद्धातील दृश्यांचाही भारत-पाकिस्तान संघर्षाची छायाचित्रे म्हणून सर्रास प्रसार केला जात आहे.

‘पीआयबी’कडूनही पडताळणी

केंद्र सरकारच्या ‘प्रेस इन्फर्मेशन ब्युरो’कडूनही नियमितपणे चित्रफितींची पडताळणी करण्यात येत आहे.

त्यात प्रामुख्याने पाकिस्तान सरकार किंवा समाजमाध्यम वापरकर्त्यांकडून प्रसारित केल्या जाणाऱ्या खोट्या माहितीची चिरफाड करण्यात आली.

अशा सात घटनांचे खंडन करणारी वस्तुस्थिती पीआयबीच्या सत्यशोधन समितीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत मांडली.

‘सैन्याच्या हालचालींचे थेट प्रक्षेपण टाळा’

नवी दिल्ली : वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षेची जबाबदारी आणि महत्त्व लक्षात घेता सुरक्षा दलांच्या हालचालींचे थेट प्रक्षेपण किंवा वृत्तांकन टाळा, असे आवाहन संरक्षण मंत्रालयाने वृत्तवाहिन्या, डिजिटल माध्यमांना केले आहे. संवेदनशील माहितीचा खुलासा केल्यास सुरक्षा दलाच्या मोहिमेवर परिणाम होऊ शकतो, असे मंत्रालयाने स्पष्ट केले.