सांगली महिला वनपरिक्षेत्र अधिकारी विनयभंग प्रकरणातील उपवनसंरक्षक विनय माने यांची उपवनसंरक्षक (कार्यआयोजना) या पदावर बदली करण्यात आली आहे. मात्र, या बदलीमागे राज्य शासनाने प्रशासकीय कारण दिले आहे. माने यांची बदली नको तर निलंबन हवे, अशी मागणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या वर्तुळातून केली जात आहे. मेळघाट वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेला एक वर्ष होत नाही तोच सांगलीचे उपवनसंरक्षक विजय माने यांच्याविरोधात सांगली महिला वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दिली. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या दबावानंतर वनखात्याने माने यांचा कार्यभार काढून घेतला होता, पण मुख्यालय कायम ठेवले. त्यामुळे माने यांनी तक्रारकर्त्या महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अखेरीस या महिला अधिकाऱ्याने न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. मात्र, निलंबनाऐवजी बदली करुन राज्यशासनाने सावध भूमिका घेतली. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर वनखात्याची यंत्रणा थोडीफार सक्रीय झाली होती. या प्रकरणातील तत्कालीन उपवनसंरक्षक तसेच अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकांना तातडीने निलंबित करण्यात आले होते. याही प्रकरणात राज्यशासन त्या महिला अधिकाऱ्याच्या आत्म्हत्येची वाट पाहात आहे का, असा प्रश्न उपस्थित करुन उपवनसंरक्षक विजय माने यांच्या निलंबनाची मागणी त्यांनी शासनाकडे लावून धरली आहे. दरम्यान, माने यांनी या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला हेाता. ३० मे पर्यंत त्यांचा अंतरिम जामीन वाढवण्यात आला आहे.