इतर पक्ष सत्तेत असूनदेखील वारंवार कार्यक्रम राबवत असतात. परंतु, काँग्रेसचा पदाधिकारी बदलायला तयार नाही, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी केली. दरम्यान, शहर काँग्रेसने ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाची तयारी सुरू केली असून हे अभियान २३ जानेवारीपासून राबवण्यात येणार आहे. हेही वाचा- गडकरींना धमकी देणारा म्हणतोय, ‘आरोप करण्यापूर्वी स्मार्टफोन शोधा आणि सीमकार्ड पण दाखवा’; पोलीस त्रस्त ‘भारत जोडो’ यात्रेनंतर राष्ट्रीय पातळीवर ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान काँग्रेस राबवत आहे. त्यासंदर्भातील बैठक आज देवडिया काँग्रेस भवनात शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी घेतली. यावेळी मुत्तेमवार यांनी स्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. ते म्हणाले, भाजपाने अनेक खोटी आश्वासने दिली. बेरोजगारी असो, नोटबंदी असो, पेट्रोल, गॅस असो अशा अनेक बाबींवर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली पाहिजे. आज मध्यमवर्गीयांना महिन्याच्या शेवटी पैशाचा ताळमेळ करणे कठीण झाले आहे. त्यांच्या पाठीशी काँग्रेसचा कार्यकर्ता गंभीरतेने उभा असलाच पाहिजे. भाजप मंदिर, मशीद असा वाद वारंवार निर्माण करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत असते. लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सतत चर्चा करणे आवश्यक आहे, असे मुत्तेमवार म्हणाले. यावेळी शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, सोशल मीडिया अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, प्रधान महासचिव डाॅ. गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, पुरुषोत्तम हजारे उपस्थित होते. हेही वाचा- “संजय राऊतांचा मला फोन आला आणि त्यांनी…”, आमदार कपिल पाटलांनी सांगितला उमेदवार माघारीचा किस्सा असे आहे अभियान आमदार विकास ठाकरे यांनी ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाची सुरुवात ब्लाॅक व प्रभाग निहाय राबवायचीआहे, अशी सूचना केली. संपूर्ण कार्यक्रम २३ जानेवारीपासून प्रारंभ करून मार्च-२०२३ पर्यंत राबवण्यात येईल. या कार्यक्रमात नागरिकांना बेरोजगारी, शेतमजूर, लहान व्यापारी समस्या व धर्मांध शक्तींचा बीमोड करण्यासाठी ब्लाॅक अध्यक्षांनी ब्लाॅकमधील आमदार, माजी खासदार, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, सेलचे अध्यक्ष, समस्त पदाधिकाऱ्यांसह घरोघरी जाऊन छोट्या बैठका घेऊन, पदयात्रा काढून कार्यक्रम राबवला जाईल. हेही वाचा- अमरावती : आमदार नितीन देशमुख यांची एसीबी कार्यालयात चौकशी; शिवसेनेच्या ठाकरे गटाची घोषणाबाजी गैरहजर ब्लॉक अध्यक्षांची हकालपट्टी करणार अभियान राबवताना ब्लाॅक अध्यक्षांनी कुठल्याही प्रकारच्या गटबाजीचा विचार न करता सर्वाना सहभागी करून घ्यावे. जे ब्लाॅक अध्यक्ष अनुपस्थित राहतील त्याच्या जागी नव्या नावांचा विचार करण्यात येईल. तसेच सेलच्या अध्यक्षांवर देखील निरीक्षक नेमून त्यांच्या कार्याचा आढावा शहर काँग्रेस घेईल. सक्रिय नसलेल्या सेलच्या अध्यक्षाच्या जागी दुसरी नियुक्ती करण्यात येईल, असा इशारा ठाकरे यांनी दिला.