देवेश गोंडाणे, लोकसत्ता 

नागपूर : राज्यात शहरी भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे यंदा १ लाख ८१ हजार जागा रिक्त असल्याने कनिष्ठ महाविद्यालयांचे भविष्य धोक्यात आहे. अकरावी प्रवेशासाठी सुरू असलेल्या विशेष फेरीनंतर मुंबईमध्ये १ लाख ९ हजार, पुण्यात ३६ हजार तर नागपुरात २१ हजार व अन्य शहरांतील जागा पकडून राज्यातील एकूण १ लाख ८१ हजारांवर जागा रिक्त आहेत.

मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती या शहरांतील महापालिका क्षेत्रात अकरावीसाठी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. मात्र, दोषपूर्ण प्रक्रियेमुळे तिला मोठय़ा प्रमाणात विरोध होत आहे. इंग्रजी शाळांचे वाढते वलय लक्षात घेता मराठी माध्यमांच्या शाळांना आता घरघर लागली असून प्राथमिक आणि माध्यमिकच्या शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे. यामुळे दरवर्षी शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरत असून समायोजनाची डोकेदुखी वाढली आहे. यात आता कनिष्ठ महाविद्यालयांचाही समावेश होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

हा संभाव्य धोका ओळखूनच अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी स्वयंअर्थसाहाय्यित तत्त्वावर प्राध्यापकांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. मागील काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा ओढा ‘सीबीएसई’ शिक्षणाकडे आहे. त्याचा फटका कनिष्ठ महाविद्यालयांना बसत आहे. मागील दोन वर्षांतील राज्यातील अकरावी प्रवेशातील रिक्त जागांशी यंदाची तुलना केल्यास रिक्त जागांचे संकट अधिक गडद झाल्याचे दिसत आहे. दहावीची परीक्षा महाविद्यालय स्तरावर झाल्याने निकालात मोठी वाढ झाली. त्यामुळे खूप प्रवेश होतील अशी अपेक्षाही आता धूसर झाली आहे. अकरावीसाठी यंदा राज्यात एकूण ५ लाख ८२ हजार जागांवर प्रवेश अपेक्षित होते. परंतु सर्व फेऱ्या संपून विशेष फेरी सुरू असताना केवळ ४ लाख ६७५ जागांवर प्रवेश झाले. यामुळे १ लाख ८१ हजारांवर जागा रिक्त आहेत.

शिकवणी वर्गाचे संलग्नीकरण घातक

सध्या शिकवणी वर्गाचे लोण सर्वत्र पसरले असून अकरावीचा प्रवेश हा नाममात्र राहिला आहे. अनेक शिकवणी वर्गाचे महाविद्यालयांशी संलग्नीकरण असते. त्यामुळे विद्यार्थी अशाच महाविद्यालयातील प्रवेशाला प्राधान्य देतात. मात्र, ऑनलाइन प्रवेशामुळे आपल्या शिकवणी वर्गाचे संलग्नीकरण असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाणे कठीण जाते. त्यामुळे शिकवणी वर्गानी आपला मोर्चा शहरालगतच्या ग्रामीण भागातील महाविद्यालयांकडे वळवला आहे. परिणामी, शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ही धोक्याची घंटा ठरत असून येथील शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

रिक्त जागा

शहर         प्रवेश क्षमता    प्रवेश निश्चिती   रिक्त जागा

मुंबई         ३,७१,७९५       २,६२,३७०       १,०९४२५

पुणे          १,११,७५०       ७५,३८४       ३६,३६६

नागपूर        ५५,८००       ३४,०९१       २१,७०९

नाशिक        २६,४८०       १८,४२६       ८,०५४

अमरावती    १६,१९०     १०,४०४       ५,७८६