परिचारिकांची पदे बाह्यस्त्रोत पद्धतीने भरू नये, यासह इतर मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे सकाळी एक तास कामबंद आंदोलन सुरू होते. आता आजपासून दिवसभर कामबंदची घोषणा संघटनेने केली आहे. यामुळे मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील रुग्णांचा जीव टांगणीला लागला असून येथे केवळ अत्यवस्थ रुग्णांनाच दाखला दिला जाईल, असे संकेत मिळत आहे. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने वैद्यकीय शिक्षण खात्याला बाह्यस्त्रोत पद्धतीने परिचारिकांची पदे भरू नये, केंद्र सरकारप्रमाने वेतन व भत्ते द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी सोमवारपासून सकाळी १ तास कामबंद व निदर्शने आंदोलन केले. सलग तीन दिवस शासनाने आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आंदोलकांनी आजपासून पूर्णपणे कामबंद आंदोलनाची घोषणा केली आहे. नाईलाजाने आंदोलन करावे लागत असल्याचा संघटनेचे झुल्फि अली याचे म्हणणे आहे. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास २८ मेपासून संपाची घोषणाही त्यांनी केली. यामुळे रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून आंदोलनात सहभागी न झालेल्या परिचारिकांच्या सेवा अतिदक्षता व गंभीर रुग्ण विभागात लावणे आणि बीएस्सी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची सामान्य वार्डात सेवा लावण्याचे नियोजन तीनही रुग्णालय प्रशासनाने केले आहे. निवासी डॉक्टरांसह शिकाऊ डॉक्टरांच्या सेवाही विविध वार्डात लावल्या जाणार आहे. मोठ्या संख्येने परिचारिका संपात सहभागी होण्याची शक्यता असल्यामुळे केवळ अत्यवस्थ रुग्णांनाच रुग्णालयात दाखल केले जाईल. इतर सामान्य रुग्णांबाबत परिचारिकांची उपस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मेडिकलच्या वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाने कोणत्याही रुग्णाला त्रास होऊ नये म्हणून आवश्यक काळजी घेतल्याचा दावा केला आहे.