गडचिरोली: लग्न आणि स्वागत समारंभही आटोपला.परंतु नियतीला काही वेगळेच मंजूर होते. अचानक प्रकृती बिघडली आणि हळद सुकण्यापूर्वीच नववधूच्या मांडीवर डोके टेकवत नवरदेवाचा मृत्यू झाला. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना कोरची तालुक्यातील गहाणेगाटा येथे आज घडली. नारायण कंवलसिंह बोगा(२६) असे मृत नवविवाहित युवकाचे नाव आहे.
नारायण बोगा हा अत्यंत साधा, १५ वर्षांपूर्वी वडिलांचे छ्त्र हरपले. तेव्हापासून घरी आई आणि नारायण दोघेच राहायचे. कित्येक वेळा आईने काबाडकष्ट करुन आपणास मोठे केले. यामुळे तिच्या मदतीला चांगली सून हवी, असे त्याला कायम वाटायचे. म्हणून यंदा नारायणने लग्न करण्याचे ठरवले.
आईनेच मुलगी बधितली. ३० एप्रिला छत्तीसगड राज्यातील मानपूर-चौकी तालुक्यातील माधोपूर येथील फिरुराम कुमेटी यांची मुलगी दीपिका आणि त्याचा रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला.
दुसऱ्या दिवशी १ मे रोजी नारायणच्या गावी स्वागत समारंभही पार पडला. लग्राच्या दिवशी पोटात दुखत असल्याचे त्याने नातेवाईकांना सांगितलं होतं. त्यामुळे स्वागत समारंभाच्या दिवशी तो बेतकाठी येथील एका खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घेऊन परतला.त्याला बरे वाटू लागले. मात्र, पुन्हा त्याच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे तो मित्र आणि नववधूला घेऊन स्वत:च मोटारसायकल चालवत वासळी येथील दवाखान्यात जाण्यास निघाला.परंतु बोरी गावाजवळ जाताच त्याची प्रकृती अधिकच बिघडली.
मोटारसायकल थांबवून त्याने नववधूच्या मांडीवर डोके टेकले आणि तेथेच त्याने प्राण सोडला. या घटनेमुळे गहाणेगाटा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
लग्नघरी शोककळा
नारायण व दीपिका यांचे लग्न होऊन तीनच दिवस झाले होते. अंगावरील हळद उतरण्यापूर्वीच नारायणला नियतीने हिरावून घेतले. त्यामुळे सुखी संसाराचे स्वप्न अधुरे राहिले. लग्नामुळे घरी आनंदाचे वातावरण होते, पण या घटनेने हे क्षण दु:खात बदलले. संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.