चंद्रपूर : मुल शहरात होणारा मालधक्का हा सर्वांना मान्य असणाऱ्या जागेवर, विशेषतः प्रदूषण न होणारी जागा निवडून त्याठिकाणी उभारण्यात यावा. याबाबत लोकभावनेचा आदर करावा, असे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वेच्या उच्चाधिकाऱ्यांना दिले.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुल शहरातील मालधक्का शहराबाहेर हलवण्याच्या नागरिकांच्या मागणीच्या अनुषंगाने रेल्वे विभागाच्या उच्चाधिकाऱ्यांसह वनभवन नागपूर येथे बैठक घेतली. या मालधक्क्यामुळे मुल शहरातील नागरिकांना मोठया प्रमाणावर प्रदूषणाचा सामना करावा लागणार आहे. यामुळे जनतेमध्ये असंतोष आहे.

या संदर्भात टोलेवाही-केळझर-भगवानपूर या रस्त्यालगतच्या जागेला भेट देत पाहणी करावी व जनतेला व नागरिकांना प्रदूषणाचा सामना करावा लागू नये, अशी जागा मालधक्क्यासाठी निवडावी, असे निर्देश पालकमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.७ किंवा ८ ऑक्टोबरला जागेची पाहणी करण्यात येईल व त्याअनुषंगाने योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन रेल्वेचे अतिरिक्त विभागीय प्रबंधक सुर्यवंशी यांनी दिले. यावेळी वरिष्ठ विभागीय प्रबंधक गर्ग, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. अजय गुल्हाने, मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर यांच्यासह जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्या गुरनुले, चंदू मारगोनवार, प्रभाकर भोयर, अजय गोगुलवार, चंद्रकांत आष्टनकर, प्रशांत बोबाटे, अजय दुबे, नामदेव डाहुले आदी उपस्थित होते.