नागपूर : ऋषीमुनींनी वास्तुशास्त्राचा संबंध धर्माशी जोडला आहे. मात्र, धर्मासोबत वास्तुशास्त्र विज्ञानाशीही निगडित आहे. वास्तुशास्त्राचे नियम ऋषींनी मोठी तपश्चर्या करून अनुभवाच्या जोरावर तयार केले आहेत. आजच्या विज्ञानाच्या परीक्षेतही हे नियम खरे ठरतात म्हणून वास्तुशास्त्राला वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघण्याची आवश्यकता आहे. वास्तुशास्त्राच्या आधारे घर बांधल्याने जीवनात सुख, शांती व समृद्धी येते, असा सल्ला कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे प्रभारी कुलगुरू डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी दिला. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या वेदांग ज्योतिष विभाग व वास्तुशास्त्र विभागाद्वारे तीन दिवसीय वास्तुशास्त्र कार्यशाळेच्या समारोपाला प्रभारी कुलगुरू डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी हे विधान केले. ज्योतिषशास्त्राचाच एक भाग म्हणून वास्तुशास्त्र ओळखले जाते. ज्या पंचमहाभूतांच्या तत्त्वांवर ज्योतिषशास्त्र आधारित आहे त्याच तत्त्वांवर वास्तुशास्त्रही आधारित आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांमधून वाहणारी ऊर्जा संपूर्ण वातावरणावर परिणाम करत असते. त्या ऊर्जेचा विधायक उपयोग करून त्या वास्तूत राहणाऱ्या व्यक्तीच्या भल्यासाठी व्हावा, अशी रचना करणे म्हणजे वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्रानुसार भौगोलिक परिस्थिती, निसर्ग, पृथ्वीचे चुंबकत्व अशा अनेक बाबींचा विचार करून आणि निसर्गनियमांचे पालन करून वास्तू निर्माण केल्या जातात, असेही डॉ. पेन्ना म्हणाले.