रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत हाहाकार उडाला आहे. जोरदार पावसामुळे दोन्ही जिल्ह्यांतील जनजिवन विस्कळीत झाले असून अनेक मार्ग बंद आहेत. त्यातच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरणसुद्धा ‘ओव्हरफ्लो’ झाले आहे.

वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत. गोंदिया-नागपूर महामार्ग, गोंदिया-आमगाव मार्ग, गोरेगाव ते आमगाव मार्ग, कुर्हाडी-गोरेगाव मार्ग बंद आहेत. दुसरीकडे, भंडारा जिल्ह्यातील ५४ मार्ग बंद करण्यात आले आहे. जलसाठ्यात वाढ झाल्यामुळे सिरपूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. इटियाडोह प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे