नागपूर: मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्याने आपले प्रखर रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढत आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, तीन मार्चला धुलिवंदनापासून राज्याच्या तापमानात मोठी वाढ होणार आहे. काही भागांत पारा तीन अंश सेल्सियस ते चार अंश सेल्सियसने वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे ही स्थिती निर्माण झाली असून नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भात तापमानाचा उच्चांक
राज्यात सध्या सर्वाधिक उष्णता विदर्भात नोंदवली जात आहे. अमरावती आणि वर्धा येथे तापमान ३७ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत नागपूर, अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांत पारा ३४ ते ३७ अंश सेल्सियसच्या दरम्यान राहील. विदर्भातील उष्णतेची ही लाट पाहता दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे धोकादायक ठरू शकते.
कोकणात दमट हवामान
मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात सध्या उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव जाणवत आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत बुधवारी आणि गुरुवारी हवेतील आर्द्रता वाढल्याने अस्वस्थता अधिक जाणवेल. मुंबईचे तापमान कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस आणि किमान २४ ते २६ अंश सेल्सियसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. समुद्रकिनारी असलेल्या भागांत दमट हवामान असेल आणि उन वाढल्याने उन्हाचा चटका अधिक प्रखर भासेल.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा कोरडा
पुणे, सातारा आणि कोल्हापूर सारख्या शहरांमध्ये सध्या कोरडे आणि उष्ण हवामान आहे. पुण्यात कमाल तापमान ३१ ते ३४ अंश सेल्सियसच्या आसपास असेल. नाशिक आणि निफाड भागात सकाळी काहीसा गारवा असला तरी दुपारी मात्र कडक ऊन पडत आहे. निफाड येथे राज्याचे नीचांकी १२ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले असले, तरी दुपारी मात्र तिथेही उन्हाची तीव्रता वाढत आहे. छत्रपती संभाजीनगर आणि लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात तापमान ३३ ते ३६ अंश सेल्सियसच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
वाढत्या उन्हामुळे डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा (Heatstroke) धोका वाढला आहे. प्रशासनाने नागरिकांसाठी खालील मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नागरिकांनी शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत थेट उन्हात जाणे टाळा. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी आणि लिंबू सरबत, ताक यांसारख्या पेयांचे सेवन करा. बाहेर पडताना सुती आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करा. लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, असे आवाहन करण्यात येत आहे.
