नागपूर : दीर्घ प्रतीक्षेनंतर उपराजधानीत सोमवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. अवघ्या तासाभरात शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. उर्वरित विदर्भात मात्र पाऊस अजूनही दडी मारून बसला आहे. ऊन्ह चांगले तापले की पाऊसही तेवढाच पडतो, असा अंदाज हवामान अभ्यासक सांगतात. मात्र, यंदा ऊन्ह तापले तरीही जून महिना संपत आला असताना देखील पावसाळ्यातील पाऊस म्हणावा तसा झालेला नाही. आठ दिवसातून एकदा ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह कोसळायचे आणि पुन्हा आठवडाभर उसंत घ्यायची, असाच पावसाचा लपंडाव सुरू आहे.

सोमवारी सकाळी ऊन्ह आणि ढगांचा असाच लपंडाव सुरू असताना एक वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाने नेहमीसारखी हजेरी लावली. अचानक कोसळलेल्या पावसामुळे कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक पावसात अडकले. त्यातच शहरातील रस्ते जलमय झाल्यामुळे या साचलेल्या पाण्यातून वाट काढणे कठीण झाले. वाहनाचे दिवे लावूनही रस्त्यावर समोरचे काहीच दिसत नसल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. तासाभराच्या पावसाने संपूर्ण शहर जलमय झाले. दरम्यान अमरावती जिल्ह्यात काही भागात झालेला तुरळक पाऊस वगळता विदर्भातील इतर जिल्हे मात्र कोरडेच आहेत.