नागपूर : शहरातील अनेक उड्डाणपुलावर चक्क बाजार भरायला लागले होते. या प्रकाराबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित करताच वाहतूक पोलिसांमध्ये खळबळ उडाली. लगेच पोलिसांनी उड्डाणपुलांवर लागलेल्या दुकानांवर कारवाई केली. कार्यालयात किंवा कामाच्या ठिकाणी जाण्याचा वेळ वाचावा म्हणून वाहनचालक उड्डाणपुलाचा वापर करून गर्दी टाळतात. परंतु, आता चक्क उड्डाणपुलावरही बाजार भरण्यास सुरुवात झाली. उड्डाणपुलावरील दुकानांमुळे ग्राहकांची गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे उड्डाणपुलावर हळूहळू दुकानदारांची संख्या वाढत होती. पाचपावली उड्डाणपुलावर तर दुकानदारांमुळे अनेकदा वाहतूक कोंडी होत होती. दहीबाजार पुलावरही अनेक दुकाने थाटली होती. उड्डाणपुलावरील दुकानातील वस्तू किंवा भाजीपाला खरेदीसाठी वाहनचालक वाहने थांबवून खरेदी करीत होते. गेल्या अनेक दिवसांपासून या दुकानदारांकडे वाहतूक पोलिसांचे व महापालिकेचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होते. त्यामुळे ‘लोकसत्ता’ने ‘उड्डाणपुलावर भरतो बाजार, वाहनधारकांनीच रस्त्यावरच खरेदी’ असे वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची वाहतूक पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन शहरातील सर्वच उड्डाणपुलावर कारवाई केली. महापालिकेशी पत्रव्यवहार वाहतूक पोलीस विभागाने उड्डाणपुलावरील बाजार किंवा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची सूचना अतिक्रमण विभागाला करण्यात आली आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, असे कृत्य केल्यास वाहतूक पोलिसांकडून नक्कीच कारवाई करण्यात येईल. उड्डाणपुलावरील दुकाने हटवण्यात आली आहेत. यानंतर वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. - सारंग आवाड, (पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा)