गडचिरोली : नव्या पोलीस अधीक्षकांनी अवैध दारूविक्रीविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, पुन्हा परिस्थिती जैसे थे झाल्याने तत्काळ अवैध दारूविक्री बंद करून दारू माफियांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलीस बॉइज असोसिएशनने निवेदनाद्वारे केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात बंदीनंतरही तीन दशकांपासून अवैध दारूविक्री सुरू आहे. यातून दरवर्षी शेकडो कोटींची उलाढाल होत असते. जिल्ह्यातील सर्वच उपविभागात हा प्रकार सर्रास चालू आहे. यामुळे प्रत्येक गावात दारूमाफिया तयार झाले आहेत. पोलिसांनी कितीहीवेळा कारवाई केल्यास त्यांच्यावर फारसा फरक पडत नाही. तर अनेक ठिकाणी यांचे पोलिसांशी साटेलोटे असल्याचे दिसून येते. त्यामुळे अवैध दारूविक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. हेही वाचा >>> नागपूर : भाजपचे आमदार बंटी भांगडियांवर विनयभंगाचा गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ नवीन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी रुजू होताच सर्वात आधी अवैध दारूविक्रीवर चाप बसविण्याच्या सूचना सर्वच पोलीस ठाण्यांना दिल्या होत्या. यामुळे दारूमाफियांचे धाबे दणाणले होते. परंतु दोन महिन्यानंतर परिस्थिती जैसे थे झाली. आजघडीला गडचिरोली शहरासह जिल्हाभरात खुलेआम दारूविक्री सुरू आहे. हा सर्व प्रकार तत्काळ बंद करून जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी नाका लावण्यात यावा अशी मागणी पोलीस बॉईज असोसिएशनच्या सदस्यांनी केली आहे. यावेळी जिल्हा अध्यक्ष गिरीष कोरामी, उपाध्यक्ष आकाश ढाली, शहर उपाध्यक्ष ओम वट्टी, विक्रांत मडावी, प्रंशांत शेडमाके, रजत कुकुडकर, विकी कडते आदी सदस्य उपस्थित होते. अहेरी, देसाईगंज आणि गडचिरोली उपविभाग आघाडीवर जिल्ह्यातील अहेरी, देसाईगंज आणि गडचिरोली पोलीस उपविभागाला चंद्रपूर,भंडारा आणि तेलंगणाची सीमा लागून आहे. त्यामुळे हे उपविभाग दारू तस्करीचे केंद्र ठरत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्गावरून दररोज १० ते १५ लाखांची अवैध दारूची वाहतूक होत असते. सर्वांचे हफ्ते बांधलेले आहेत. त्यामुळे आमचे कुणीही काही बिघडवू शकत नाही. या आवेशात हे दारू तस्कर वावरतात.