चंद्रपूर : महाराष्ट्र सरकारने काढलेल्या शासन निर्णयाची राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या वतीने स्थानिक गांधी चौकात होळी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली.
मराठा समाजाला सरसकट ओबीसीमध्ये समाविष्ट करू नये या प्रमुख मागणीकरीता सोमवारपासून चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे हे ११ सप्टेंबरपासून आंदोलनाला बसले आहेत. राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची ठिणगी चंद्रपुरात पहायला मिळाली. मराठा समाजाच्या जालन्यात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांच्या, मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात सामील करावे या मागणी विरोधात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.




हेही वाचा – चंद्रपूर : वीज कोसळून एक महिला ठार, अन्य एक महिला जखमी
हेही वाचा – उद्योग सुरू करण्यासाठी आता ‘हे’ मंडळ देणार १५ लाखांचे कर्ज, व्याज परतावा…
मराठा समाजाच्या मागणीचा चंद्रपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने तीव्र विरोध केला आहे. ओबीसी (विजा, भज आणि विमाप्र, इत्यादी) समाजात तब्बल ४२३ च्या वर जाती आहे. त्यामध्ये आता मराठा समाज समाविष्ठ झाले तर आपल्या समाजाला न्याय मिळणार नाही, मराठा समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे. आतापर्यंत मराठा समाजाने मोठमोठे मोर्चे काढून मागणी रेटून धरली आहे. मात्र आपल्याला एकत्रित येऊन लढा देण्याची वेळ आली आहे, त्याकरिता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी चंद्रपुरात पुढाकार घेत १७ सप्टेंबरला हजारो ओबीसी बांधवांच्या महामोर्चातून आक्रोश व्यक्त केला. त्याचा एक भाग म्हणून चंद्रपूरात आज गांधी चौक येथे कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाद्वारे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या ओबीसी बंधू रवींद्र टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाचे ओबीसीकरन करण्याकरिता काढलेल्या शासना निर्णय क्रमांक मआसु २०२३/प्र. क्र.०३/१६- क जीआरची महाराष्ट्र शासन निर्णयाची होळी करून मनीषा बोबडे, कुसुम उदार, मीनाक्षी गुजरकर, सरिता लोंढे, सुनीता काळे, प्रभा साळवे, सविता वैरागडे, ममता क्षीरसागर, सुलभा जक्कुलवार, रीना येरणे, कविता वैरागडे, सरला झाडे, रीना त्रिवेदी, रूपा जुमडे, सरोजिनी वैद्य, मनीषा यामावार, कल्पना यामावार, किरण पावसकर, माया चौधरी, रजनी गोखले, चंदा सोरते, स्नेहल चौधडे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. उपोषणकर्ते रवींद्र टोंगे यांच्या उपोषणस्थळी २१ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता ओबीसी समाजातील युवक राज्य सरकारच्या निषेधार्थ मुंडन करणार आहेत.