नागपूर : पोलीस नियंत्रण कक्षाला ‘डायल ११२’ वर फोन करून एखाद्या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर पोलीस कर्मचारी तक्रारकर्त्यांची माहिती सार्वजनिक करतात. तसेच ज्यांच्याविरुद्ध तक्रार दिली किंवा माहिती दिली त्यांना तक्रारकर्त्यांबाबत माहिती देतात, त्यामुळे आता पोलीस नियंत्रण कक्षाला तक्रार किंवा माहिती देणे अनेकांना अडचणीचे ठरत आहे. संशयित व्यक्ती, समाजविघातक कृत्य करणाऱ्या प्रवृत्तीबाबत किंवा गैरकृत्य करणाऱ्यांबाबत अनेक जण पोलीस नियंत्रण कक्षाला ‘डायल ११२’ वर माहिती किंवा तक्रार करतात. ती तक्रार ‘११२ डायल’ कक्षात नोंदवली जाते. तक्रार नोंदवताना कक्षातील कर्मचाऱ्यांकडून अनेक प्रश्न विचारून संभ्रमात टाकले जाते. बराच वेळ विचारपूस केल्यानंतर घटनास्थळ असलेल्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना कळवण्यात येते. काही वेळानंतर पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळावर पोहचण्यासाठी निघतात. परंतु, पोहचण्यापूर्वीच पोलीस कर्मचारी तक्रारकर्त्यांना फोन करून घटनास्थळ आणि तक्रारीबाबत विचारपूस करतात. अनेकदा पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्याच्या हद्दीची पुरेपूर माहिती नसते. त्यामुळे तक्रारकर्त्यांना वारंवार फोन करून माहिती विचारली जाते. घटनास्थळावर पोहचल्यानंतर ज्यांच्याविरुद्ध माहिती दिली असेल त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी किंवा ती समस्या सोडवण्याऐवजी पोलीस कर्मचारी तक्रार करणाऱ्यांचे नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक सांगतात. त्यामुळे तक्रारकर्त्यांची गोपनीयतेचा भंग केला जाते. हेही वाचा: “घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चर्चेचं आव्हान दिलं, पण…”, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात पोलीस समज देऊन किंवा समस्या सोडवून निघून जातात. परंतु, पोलीस कर्मचाऱ्यांच्या या कृतीमुळे समस्या सुटण्याऐवजी तक्रारकर्ता आणि ज्यांच्याविरुद्ध तक्रार केली तो व्यक्ती यांच्यात वाद निर्माण होतात. एकमेकांना शिवीगाळ किंवा हाणामारीपर्यंत प्रकरण वाढते. पोलिसांनी तक्रारकर्त्यांची माहिती सार्वजनिक करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे अनेक जण पोलिसांची मदत घेण्याऐवजी टाळाटाळ करीत असल्याची माहिती समोर आली आहे. नवख्या कर्मचाऱ्यांना अपुरी माहिती ‘डायल ११२’ कक्षात पोलीस कर्मचाऱ्यांऐवजी करारतत्त्वावर कर्मचारी काम करतात. त्यांना शहराची योग्य माहिती नसते. त्यामुळे घटनास्थळ आणि पोलीस ठाण्याच्या हद्दीबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो. अनेकदा तक्रारकर्त्यांनाच पोलीस हद्दीबाबत माहिती विचारण्यात येते. त्यामुळे नियंत्रण कक्षात फोनवरून तक्रार केल्यानंतर समस्या सुटण्याऐवजी अडचणी जास्त असल्याचे प्रकार समोर आले आहे. हेही वाचा: अधिवेशनाच्या आडून मुख्यमंत्री पुत्राचे ब्रॅण्डिंग; ठिकठिकाणी फलक, राजकीय वर्तुळात चर्चा वरिष्ठांनी घ्यावी दखल पोलीस ठाण्यातील कर्मचारी तक्रारकर्त्यांशी सौजन्याने वागत नाहीत. पोलीस कर्मचारी तक्रारकर्त्यांनाच त्रस्त करून सोडतात. पोलीस ठाण्यात बोलावतात किंवा घटनास्थळवरून धाकदपटशा करतात. तसेच तक्रारकर्त्यावर राग काढून किंवा आरडाओरड करीत असल्याचे प्रकार समोर आले आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अशा प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.