गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात आदिवासी तीर्थक्षेत्र कचारगड यात्रेत देशभरातून लाखो आदिवासी सहभागी होतात.. तथापि एसटीच्या गोंदिया आगाराने यात्रेसाठी कमी गाड्या सोडल्याने यात्रेकरूंची गैरसोय झाली.
एसटीतर्फे १५ विशेष बसेस सोडणार
अशी घोषणा करण्यात आली होती. पण अगदी तिसऱ्या दिवसा पासून बसेसची संख्या कमी झाली. संध्याकाळी ५ नंतर कचारगडला जाण्यासाठी किंवा ७ नंतर सुटण्यासाठी एसटी बसेस उपलब्ध नसल्याने, हजारो यात्रेकरूना जवळच्या दरेकसा रेल्वे स्थानकावर पोहोचण्यासाठी ५ किलोमीटर ची पायपीट करावी लागली. परिणामी, मोजक्याच रेल्वे गाड्यांचा थांबा असल्यामुळे नेहमीच निर्जन दिसणाऱ्या या छोट्या दरेकसा स्थानकावर हजारो च्या संख्येने प्रवासी त्यांच्या गंतव्यस्थानावर जाण्यासाठी गाड्यांची वाट पाहत उभे राहिले. पण या स्थानकावर मोजक्याच पसेंजर गाड्यांचा थांबा असल्यामुळे तिथेही त्यांना तासनतास वाट पहावी लागली.या काळात अनेक प्रवासी पुलाचा वापर करण्याऐवजी पायी रुळ ओलांडून आपला जीव धोक्यात घालताना दिसले.
या संदर्भात एसटी गोंदिया डेपो मॅनेजर यतीश कटरे म्हणाले की, यात्रेदरम्यान कचारगडसाठी १५ अतिरिक्त बसेस चालवण्याचे नियोजन होते. परंतु कर्मचाऱ्यांची कमतरता आणि इतर काही कारणांमुळे काही फेऱ्यांवर परिणाम झाला, परंतु बहुतेक बसेस नियोजनानुसार धावल्या. कचारगडला जाण्यासाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आणि तेथून परत येण्यासाठी सायंकाळी ७ वाजेपर्यंत बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. ज्या नियोजित वेळापत्रकानुसारच राहिल्या. त्यानंतर प्रवाशांना खाजगी मार्गाने किंवा रेल्वेने प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध होता.
पाच दिवसीय कचारगड यात्रेत देशाच्या कानाकोपऱ्यातील गोंड, आदिवासी समाज बांधवांनी हजेरी लावून त्यांच्या दैवतांचे स्मरण केले. गोंडी धार्मिक परंपरा, बोलीभाषा, पूजाविधी, नृत्य, चालीरीती, कला, संस्कृती दर्शन यात्रेदरम्यान घडले. देशातील १८ राज्यातून पाच लाखांवर गोंडी भाविक कचारगड येथे आले होते. त्यात महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, बिहार, झारखंड, ओडिशा, बंगाल, उत्तर प्रदेश व आंध्र प्रदेशातील आदिवासी भाविकांची संख्या जास्त होती, तर दिल्ली, उत्तराखंड, आसाम अरुणाचल प्रदेश मेघालय, कर्नाटक ,नागालँड ,गुजरात या राज्यातील आदिवासी बांधवांसह इतर ही नागरिकांच्या सुद्धा समावेश होता.

