मुंबई, पुण्याच्या तुलनेत विदर्भ, मराठवाड्यात रिक्त पदे अधिक नागपूर : विकासात मागास असलेल्या विदर्भ, मराठवाड्यात विविध सरकारी विभागांत पुण्या-मुंबईच्या तुलनेत रिक्त पदाची संख्या अधिक असून भूमि अभिलेख विभागही त्याला अपवाद नाही. या विभागात एकूण रिक्त वर्ग दोनच्या १३३ पदांपैकी विदर्भ व मराठवाड्यातील पदांची संख्या ९८ आहे. या तुलनेत पुणे विभागात ६ तर मुंबई विभागात ११ इतकी अत्यंत कमी आहे. दरम्यान, रिक्तपदांपैकी ९२ पदे पदोन्नतीतून भरली जाणार असून ती भरताना विदर्भातील रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्याची मागणी होत आहे. विदर्भ, मराठवाड्याला विकास निधी कमी मिळतो, मिळालेला निधी रिक्त पदांमुळे खर्च होत नाही. असे झाल्यावर तो इतरत्र वळता केला जातो, असा आरोप या भागातील लोकप्रतिनिधी वर्षानुवर्षे करीत आले तरी चित्र बदलले नाही. भूमि अभिलेख या महत्त्वाच्या विभागातील रिक्त पदाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास ही बाब स्पष्ट होते. या विभागात वर्ग दोनची एकूण १३२ पदे रिक्त आहेत. त्यात सर्वाधिक संख्या ही विदर्भ, मराठवाड्यातील आहे. याचा विभागाच्या कामकाजाला फटका बसला असून जमीन मोजणीसह अनेक कामे प्रलंबित आहेत. ही पदे भरावी म्हणून कर्मचारी संघटना सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत होती. अखेर महसूल विभागाने १३३ रिक पदांपैकी ९२ पदे पदोन्नतीतून भरण्यास मंजुरी दिली आहे. विदर्भ,मराठवाड्यात रिक्तपदांची संख्या अधिक असल्याने पदोन्नतीतून ती भरताना या विभागांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी आहे. पुणे-मुंबई-नाशिक भागातील कर्मचारी विदर्भात येण्यास इच्छुक नसतात, त्यामुळेही या भागातील पदे रिक्त राहतात, हे येथे उल्लेखनीय. ‘‘मुंबई-पुण्याच्या तुलनेत विदर्भात वर्ग-२च्या रिक्त पदांची संख्या अधिक असल्याने पदोन्नतीने ही पदे भरताना या भागाला प्राधान्य देण्यात यावे’’ -श्रीराम खिरेकर, सरचिटणीस, विदर्भ भूमि अभलेख कर्मचारी संघटना.