३१४ पैकी १८२ प्रकल्पांचे काम अजूनही अपूर्ण नागपूर : राज्यातील मोठा भूभाग असलेल्या विदर्भातील मूळ योजनेनुसार काही सिंचन प्रकल्प थंडबस्त्यात टाकण्यात आले आहेत. तसेच ३१४ पैकी १८२ प्रकल्पांचे काम अजूनही अपूर्ण आहेत. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ सिंचन क्षमता असतानाही पिछाडला आहे. विदर्भात २३ हजार लाख हेक्टर जमीन सिंचनयोग्य आहे. परंतु व्याघ्र प्रकल्प, वन जमीन आणि व्यवहार्यतेच्या कारणाने अनेक प्रकल्प थंडबस्त्यात टाकण्यात आले आहेत. काही प्रकल्प तर वन जमीन आणि इतर कारणांनी दुर्लक्षित झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यातील हुमन प्रकल्प आहे. अशा प्रकारच्या आणखी लघु, मध्यम प्रकल्पाचा विचार सोडून देण्यात आला आहे. त्याचा फटका विदर्भाला बसणार आहे. विदर्भात एकूण ३१४ सिंचन प्रकल्पांपैकी १८२ प्रकल्पांचे काम अजूनही अपूर्ण आहे. तसेच पाईप लाईनद्वारे शेतीला पाणीपुरवठा करावयाच्या ३४ प्रकल्पांचे कामही थंडबस्त्यात आहे. सिंचन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, टाईप १ म्हणजे ज्याच्यावर प्रत्यक्ष काम सुरू आहे असे प्रकल्प. त्यातून ५,२९,४८३ हेक्टर सिंचन क्षमता आहे. प्रत्यक्षात सिंचनाखाली ९९,६८६ हेक्टर आले आहे. म्हणजे, ज्या प्रकल्पांचे काम सुरू आहे त्यातून गेल्या २० वर्षांत केवळ १० टक्के देखील जमीन सिंचनाखाली आलेली नाही. टाईप २ म्हणजे जे प्रकल्प अंतिम निर्णयाची वाट पाहत आहेत. टाईप ३ जे म्हणजे प्रकल्प वनखात्यामुळे प्रलंबित आहेत. या तिन्ही प्रकारातील प्रकल्पामुळे १०,२७,४७५ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. म्हणजे, आजवर सुमारे १० लाख हेक्टर जमिनीपैकी केवळ एक लाख हेक्टर जमिनीचे सिंचन झालेले आहे. उरलेली नऊ लाख हेक्टर जमीन सिंचनापासून लांब आहे. सिंचन मंडळाने वेगवेगळी कारणे देत सुमारे ६० हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येईल असे प्रकल्प थंडबस्त्यात टाकले आहेत. ज्या प्रकल्पाद्वारे सुमारे ६० हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार होती ते प्रकल्प सिंचन महामंडळाने रद्द केले. तसेच आता अनेक प्रकल्पांची कामे अतिशय संथगतीने सुरू आहेत. अनेकदा प्रकल्प पूर्ण करण्याची तारीख निश्चित (डेडलाईन) केली. परंतु ती पाळण्यात आली नाही. परिणामी, विदर्भाचा अनुशेष कायम आहे. - अॅड. अविनाश काळे, संयोजक, लोकनायक बापूजी अणे समिती.