नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह मंत्री आणि सत्ताधारी नेत्यांकडून महापुरुषांचा अवमान केला जात आहे. तसेच आमदारांकडूनही विरोधक, अधिकाऱ्यांना धमकाविले जात आहे. त्यामुळे आपल्या पक्षातील बेताल मंत्री, नेत्यांना आवरा नाहीतर सरकारला त्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत गुरुवारी दिला. पवार यांनी सरकारमधील मंत्री, नेत्यांची महापुरुषांबद्दलची अवमानकारक वक्तव्ये, मंत्री व अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार, राज्याबाहेर चाललेले उद्योग, वाढलेली बेरोजगारी, महिलांवरील वाढते अत्याचार, अंधश्रद्धेला घातले जाणारे खतपाणी आदी मुद्दय़ांवरुन सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल उच्चपदस्थ व्यक्ती, मंत्री, लोकप्रतिनिधींकडून अवमान करणारी वक्तव्ये केली जात आहेत. तसेच अब्दुल सत्तारांना सरकारने खुली सूट दिली आहे का, अशी विचारणा करीत महिला खासदारांबद्दल त्यांनी किती वेळा अपशब्द वापरले. त्यांच्यावर काय कारवाई केली. अशाच प्रकारे सरपंच निवडून दिला नाही तर निधी देणार नाही अशी धमकी आमदार देतात, दादरला आमदार गोळीबार करतो पण कारवाई होत नाही, एक आमदार विरोधकांचे हातपाय तोडायची धमकी जाहीरपणे देतात मात्र गुन्हा दाखल होत नाही, चुन चुन के मारूंगा असे आमदार म्हणतात हे राज्यात काय चालले आहे अशी विचारणा पवार यांनी केली. ‘फडणवीस यांच्या मतदारसंघात गांधींच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरण’ नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात नथुराम हिंदू महासभेचे केंद्रीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्याचे पडसाद विधानसभेत उमटले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करीत महात्मा गांधींचा खुनी असलेल्या नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करण्यात आल्याकडे लक्ष वेधले. त्यांनी यावेळी कार्यालयाचे छायाचित्रही दाखवले. पवार म्हणाले फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपदही आहे. मात्र त्यांच्याच मतदारसंघात प्रसादनगरात नाथुराम गोडसे हिंदू महासभा केंद्रीय कार्यालय या नावाने फलक लावण्यात आला असून तेथे झेंडाही आहे. स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांची हत्या केली हे जगाला माहिती आहे. अशा खुन्याचे उदात्तीकरण केले जात असेल व ती करणाऱ्यांवर कारवाई होत नसेल तर कायदा व सुव्यवस्था कशी राहणार? ‘अरे बापरे, मला रात्रभर झोपच लागेना’ नागपूर : २०२४ मध्ये बारामतीत अजित पवार यांचा करेक्ट कार्यक्रम करू, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी प्रसार माध्यमांशी बोलताना केला होता. त्यावर आज अजित पवार यांनी गुरुवारी उपहासात्मक प्रतिक्रिया दिली ‘बापरे हे ऐकल्यापासून मला रात्रभर झोप येईना,’ असा टोला त्यांनी बावनकुळेंना लगावला. बावनकुळेंचेही प्रत्युत्तर पवारांच्या टिप्पणीवर बावनकुळे म्हणाले, शरद पवार यांच्या नावाने ते मोठे झाले आहेत. त्यांचे अस्तित्व काय? कर्तृत्व काय? त्यांनी केवळ सत्तेपासून पैसा व पैशांपासून सत्ता एवढेच काय ते केले. त्यांनी दिलेले आव्हान आम्हाला मान्य आहे. नक्कीच त्यांचे राजकीय संन्यास घेण्याचे दिवस येतील, २०२४ मध्ये त्यांचा करेक्ट कार्यक्रम होईल.