अमरावती: अंगावर वीज कोसळल्यामुळे भारतात दरवर्षी सुमारे अडीच हजार लोकांचा मृत्यू होतो. या घटना प्रामुख्याने खुल्या मैदानात किंवा ग्रामीण भागात जास्त होतात. पण, नव्या आकडेवारीनुसार शहरी भागांत वीज कोसळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे असे का होते, याचे उत्तर पर्यावरणीय बदलात दडलेले आहे. तापमानात होणारी वाढ आणि हवेतील बाष्पाचे वाढते प्रमाण यामुळे शहरी भागात वीज कोसळण्याचे प्रमाण वाढते आहे, असे सांगितले जाते. यावर आता बचावात्मक उपाय सांगण्यात आले आहेत.

प्रशासनाने सुचवली ‘ही’ उपाययोजना

मान्सून काळात, विशेषतः जून आणि जुलै महिन्यांत वीज पडण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते. यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जीवित, वित्त आणि पशुहानी होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने विकसित केलेल्या ‘दामिनी’ मोबाईल ॲपच्या वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आशिष येरेकर यांनी केले आहे.

जीपीएस प्रणालीवर आधारित

या ॲपच्या माध्यमातून वीज पडण्याच्या संभाव्य घटनांची पूर्वसूचना सुमारे १५ मिनिटे आधी मिळू शकते. जीपीएस प्रणालीवर आधारित असलेले हे ॲप वापरकर्त्याच्या सद्यस्थितीनुसार परिसरातील विजेची हालचाल आणि संभाव्य धोका दर्शविते, ज्यामुळे नागरिकांना वेळेत सुरक्षित ठिकाणी जाणे शक्य होते. ग्रामपातळीवरील सर्व स्थानिक व शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड करून, त्यातील अलर्टनुसार नागरिकांना पूर्वसूचना द्यावी आणि जीवितहानी टाळण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अशीष येरेकर यांनी केले आहे.

असे डाऊनलोड करा ‘दामिनी’ ॲप

हे ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ‘Damini Lightning Alert’ असे शोधावे आणि अधिकृत ॲप इन्स्टॉल करावे. ॲप सुरू केल्यानंतर मोबाईलचे लोकेशन (GPS) सुरू करून आवश्यक परवानग्या द्याव्यात, तसेच वेळेवर सूचना मिळण्यासाठी नोटिफिकेशन सुविधा सुरू ठेवावी.

ॲपचा वापर करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषिसेवक, आपदा मित्र व सखी, कोतवाल, आशा वर्कर्स, सरपंच आणि पोलीस पाटील यांना या ॲपचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, वीज आणि पूर या आपत्तींमध्ये ‘काय करावे व काय करू नये’ याबाबत विनाईल बोर्डच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.