नागपूर : विदर्भात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. पाऊस नसल्याने पीक करपण्यास सुरुवात झाली आहे. आणखी दोन, तीन दिवस पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येणार असल्याचे सांगण्यात येते. यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहे. ढगातून पाणी येत नसले तरी शेतकऱ्यांच्या डोळातून पाणी येत आहे. दुबार पेरणीचे संकट आल्यास पैशाची जुळवाजुळव कशी करावी, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. शासनाने त्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.

बावनकुळे म्हणाले डीपीसीतून मोफत बियाणे देणार

बोगस बियाण्यांमुळे पीक न उगवल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊन दुबार पेरणीची वेळ आल्यास, शेतकऱ्यांना स्वखर्चाने बियाणे खरेदी करावे लागणार नाही. अशा बाधित शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मोफत बी-बियाणे उपलब्ध करून दिले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

शेतकऱ्यांसाठी दुबार पेरणी संकट निवारण

“राज्यात अनेक ठिकाणी पुरवठादाराने बोगस बियाणे दिल्यामुळे सोयाबीन किंवा कापसाचे पीक उगवले नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. पीक पेरणीनंतर ते न उगवल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक भुर्दंड पडू नये, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पालकमंत्री आपल्या जिल्ह्यातील ‘डीपीडीसी’ निधीतून शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी निधी व बियाणे उपलब्ध करून देतील,” असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

६१ टक्के पेरण्या

कृषी विभागाच्या नोंदीनुसार नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ९६ हजार ६७४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून, ही एकूण अपेक्षित क्षेत्राच्या ६१ टक्के आहे. सोयाबीन आणि कापूस या प्रमुख पिकांच्या जवळपास १०० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र भात लागवडीसाठी आवश्यक असलेला पुरेसा पाऊस अद्याप न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी भातपिकाची पेरणी पुढे ढकलली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात जिल्ह्यात सरासरीच्या ६१ टक्के पावसाची नोंद झाली. तर जुलै महिन्यात १४ जुलैपर्यंत केवळ ३२ टक्के सरासरी पाऊस झाला आहे. पावसातील या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून, पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास उर्वरित पेरण्यांवर तसेच पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी जिल्ह्यात अद्याप दुबार पेरणीची कोणतीही नोंद झालेली नाही, अशी माहिती कृषी विभागाने दिली.