नागपूर : शासकीय किंवा निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यावर वारसाहक्काने त्यांच्या अविवाहित किंवा घटस्फोटित मुलींना पेन्शनचा लाभ देण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात असा नियम करता येईल का, याबाबत तपासून निर्णय घेतला जाणार आहे. भाजपच्या उमा खापरे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून या मुद्दय़ाकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. सेवेतून निवृत्त झाल्यावर आई-वडिलांना निवृत्तिवेतनाचा लाभ मिळतो, पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अवलंबित अविवाहित, घटस्फोटित, दिव्यांग किंवा मानसिकदृष्टय़ा सक्षम नसलेल्या मुलींना हा लाभ मिळत नाही. काही राज्यांत अशा प्रकारचा लाभ मुलींना दिला जातो, असे खापरे म्हणाल्या. एका राज्याच्या आदेशाचे वाचन करून त्यांनी महाराष्ट्रातही अशा प्रकारचा कायदा करण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना फडणवीस यांनी सांगितले, की अशा प्रकारे केंद्र सरकारचे नियम आहेत. त्याची तपासणी करून व राज्यातही ते लागू करता येईल का हे पाहू व लागू करू.