अमरावती : गेल्‍या चाळीस दिवसांमध्‍ये राज्‍यात मंत्रिमंडळाचा विस्‍तार होऊ शकलेला नाही. सर्व कारभार सचिवांमार्फत सुरू आहे. महाराष्‍ट्र बेवारस वाटतो आहे, राज्‍यात गुन्‍हेगारी प्रवृत्‍तीच्‍या लोकांना कुणाचा धाक राहिलेला नाही, त्‍यामुळेच महिलांवरील अत्‍याचाराच्‍या घटनांमध्‍ये वाढ झाली आहे, असा आरोप माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला.

प्रसार माध्‍यमांशी बोलताना यशोमती ठाकूर म्‍हणाल्‍या, भंडारा जिल्‍ह्यातील सामू‍हिक बलात्‍काराचे प्रकरण अत्‍यंत गंभीर आहे. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस बेजबाबदारीने वागत आहेत. त्‍यांनी महाराष्‍ट्राला अस्थिर केले. याची सर्वाधिक झळ ही सर्वसामान्‍यांना बसत आहे.

गुन्‍हेगारी प्रवृत्‍तींवर सरकारचा जो धाक असतो, तोच राहिलेला नाही. गेल्‍या चाळीस दिवसांमध्‍ये सरकार अस्तित्‍वहीन आहे. मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्री दोघेच निर्णय घेताहेत. लहान मुलांवरील, महिलांवरील अत्‍याचाराच्‍या घटना गेल्‍या दोन महिन्‍यात वाढल्‍या आहेत. जर गुन्‍हेगारांवर सरकारचा धाक राहिला, तरच लोक सुरक्षित राहतील. आम्‍ही सरकारमध्‍ये असताना महिलांच्‍या संरक्षणाच्‍या दृष्‍टीने अनेक प्रयत्‍न  केले. अस्थिर सरकारमुळे वजन राहत नाही. गुन्‍हेगार सुसाट फिरताहेत. हे सर्व थांबायला हवे, असेही त्या म्‍हणाल्‍या.