Mumbai Vidharbh Marathwada Unseasonal Rain : राज्यावर अवकाळीचे संकट कायम असून सध्या सगळीकडे पावसासाठी पोषक असे वातावरण आहे. आधी विदर्भात आणि आता विदर्भासह मराठवाडा, मुंबईतही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. विदर्भात गारपीट देखील झाली. भर उन्हाळ्यात पाऊस राज्याला झोडपून काढत आहे.राज्यात एकीकडे उन्ह तर दुसरीकडे पाऊस अशी स्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होतोय. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकांना छत्री उन्हासाठी नाही तर पावसासाठी घेऊन घराच्या बाहेर पडण्याची वेळ आलीये.नुसता पाऊसच नाही तर वादळी वाऱ्यासह गारपीट देखील होत आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईतही अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. काही ठिकाणी गारपिटीमुळे पिकांना मोठा फटका बसला. मुळात म्हणजे मार्च महिन्यापासूनच अवकाळी पावसाचे संकट राज्यावर आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याकडून पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे.पावसाचा अलर्ट जाहीर करण्यात आला असून सध्यातरी अवकाळी पावसाचा पिच्छा सुटलेला नाहीये. दरम्यान, हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दीला आहे. एवढेच नाही तर आठ जिल्हांमध्ये गारपिटीचा इशारा देखील देण्यात आला आहे. विदर्भातील काही शहरांमध्ये पुढील पाच दिवसांसाठी पावसाचा इशारा अगोदरच हवामान खात्याने दिलाय. यादरम्यान जोरदार वारेही वाहण्याची शक्यता आहे.
गडचिरोली, गोदिंया, अकोला, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, वाशिम आणि भंडाऱ्याचा समावेश आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी याठिकाणी पुढील तीन दिवसांसाठी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना, धाराशिव, छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासोबतच पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गारपिटीचा देखील इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील काही दिवस राज्यावर अवकाळीचे संकट असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.