नागपूर: राज्यातील हजारो उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. महसूल विभागाने राज्यात १७०० पेक्षा जास्त तलाठी पदे लवकरच भरून काढण्याचा निर्णय घेतला असून, या भरतीसाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्याचे शासनाच्या निर्णयानुसार, जिल्हानिहाय रिक्त जागांचा अहवाल तयार करण्यात येत आहे. आणि त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
राज्य सरकारने मेघभरतीची घोषणा केली होती. त्याचाच भाग म्हणून ही भरती राहणार असल्याची माहिती आहे. कुठल्याही शाखेतील पदवीधर यासाठी अर्ज करू शकणार आहे. मात्र ही भरती एमपीएससी कडून होणार नसून पुन्हा एकदा खासगी कंपनीकडून होण्याची शक्यता आहे.
अकरा लाख उमेदवारांनी केले होते अर्ज
यापूर्वी २०२३ मध्ये तलाठी भरती घेण्यात आली होती. या तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित करण्यात आली होती.
संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांकडून नोंदवण्यात आले. या आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९०७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले आहेत. दरम्यान, परीक्षेत एकूण ५७०० प्रश्न होते. आक्षेप नोंदवण्याच्या कालावधीत आलेल्या आक्षेपांपैकी नऊ हजार आक्षेप टीसीएस कंपनीने ग्राह्य धरले. त्यानुसार १४६ प्रश्नांमध्ये दुरुस्ती करण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी होणाऱ्या १७०० पदांच्या तलाठी भरतीसाठीही दहा लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले.
मानधनाऐवजी वेतनश्रेणी मंजूर
तलाठी पदांची भरती लवकरच होणार असली तरी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक निराशा जनक बातमी आहे. महसूल सेवकांचा समावेश चतुर्थ श्रेणीमध्ये करून त्यांना मानधनाऐवजी वेतनश्रेणी मंजूर करण्यात यावी अशी महसूल सेवकांची मागणी होती. याबाबत महसूलमंत्र्यांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. वेतनश्रेणी लागू करता येत नसल्यामुळे त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवून अनुभवाप्रमाणे अधिक गुण वाढवून देण्याच्या मुद्दावर सकारात्मक चर्चा झाली.
महसूल सेवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे आश्वासनही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी वेतनश्रेणी लागू करण्याबाबत तरतूद नसल्याचा मुद्दा चर्चेला आला. त्यामुळे त्याला पर्यायी व्यवस्था करण्यासाठी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी संदर्भात माहिती दिली होती.
