नागपूर : महावितरणच्या ग्राहकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे पाठविण्यात आलेल्या संदेशामुळे स्मार्ट मीटरबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ज्यांच्या घरी अद्याप स्मार्ट मीटर बसविण्यात आलेले नाही, त्यांचे विद्यमान मीटर ४८ तासांनंतर बदलून स्मार्ट मीटर बसविण्यात येणार असल्याची पूर्वसूचना या संदेशातून देण्यात आली आहे. मीटर बदलण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत असल्याचेही महावितरणने स्पष्ट केले आहे. दरम्यान अनेकांचा या मीटरला विरोध असतांनाही या संदेशाने पून्हा राज्यात वाद पेटण्याची चिन्ह आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनाचे काय ?

मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ग्राहकांकडे सक्तीने स्मार्ट मीटर लावले जाणार नसल्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही महावितरणकडून ग्राहकांच्या व्हाॅट्सॲवप थेट संदेश केल्याने आश्वासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दुसरीकडे आजही अनेक ग्राहकांचा स्मार्ट मीटरला विरोध आहे. त्यानंतरही हे मीटर सक्तीने बसवण्याचा प्रयत्न झाल्यास राज्यभरात पून्हा वाद वाढण्याची शक्यता आहे. या विषयावर लोकसत्ताने महावितरणच्या जनसंपर्क विभागाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यास थोड्या वेळात कळवले जाईल, असे सांगण्यात आले.

ग्राहकांना नेमका कोणता संदेश पाठविण्यात आला आहे?

महावितरणने ग्राहकांना व्हॉट्सॲपवर पाठविलेल्या संदेशात, स्मार्ट मीटर नसलेल्या ग्राहकांचे सध्याचे वीजमीटर ४८ तासांनंतर बदलण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. हा संदेश मीटर बदलण्याबाबतची पूर्वसूचना असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

मीटर कोण बदलणार आहे?

महावितरण (एमएसईडीसीएल) किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी ग्राहकांच्या ठिकाणी जाऊन विद्यमान मीटर काढून त्याऐवजी स्मार्ट मीटर बसविणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी अधिकृत कर्मचाऱ्यांनाच सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मीटर बदलण्यासाठी ग्राहकांकडून शुल्क आकारले जाणार का?

महावितरणने पाठविलेल्या संदेशात मीटर बदलण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

स्मार्ट मीटर म्हणजे काय?

स्मार्ट मीटर हे डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित वीजमीटर आहे. हे मीटर वीज वापराची माहिती स्वयंचलित पद्धतीने वीज कंपनीपर्यंत पोहोचवते. त्यामुळे मीटर रीडिंग घेण्यासाठी प्रत्यक्ष कर्मचारी पाठविण्याची गरज कमी होते.

स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना काय फायदा होणार आहे?

स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची माहिती अधिक पारदर्शकपणे मिळू शकते. मोबाईल ॲपच्या माध्यमातून वीज वापर, बिलाची माहिती आणि वापराचे स्वरूप तपासता येणार आहे. यामुळे वीज वापराचे नियोजन करणे सोपे होईल.

अचूक बिलिंगचा दावा का केला जात आहे?

स्मार्ट मीटरमधील माहिती थेट प्रणालीमध्ये नोंदवली जाते. त्यामुळे मीटर रीडिंग घेण्यात होणाऱ्या मानवी चुका किंवा तांत्रिक अडचणी कमी होऊन अधिक अचूक बिल तयार होण्यास मदत होईल, असा दावा महावितरणने केला आहे.

सौरऊर्जेशी संबंधित सवलतीबाबत काय माहिती देण्यात आली आहे?

महावितरणच्या संदेशानुसार, घरगुती ग्राहकांनी सौरऊर्जा उपलब्ध असलेल्या वेळेत वीज वापरल्यास प्रति युनिट ८५ पैशांची सवलत मिळू शकते. यामुळे ग्राहकांना वीज वापराचे नियोजन करून बचत करण्याची संधी मिळणार आहे.

ग्राहकांनी कोणती खबरदारी घ्यावी?

मीटर बदलण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळख आणि अधिकृतता तपासूनच त्यांना सहकार्य करावे. तसेच मीटर बदलताना कोणतेही शुल्क मागितले जात असल्यास त्याबाबत महावितरणकडे तक्रार करावी.

आधीच स्मार्ट मीटर बसविण्यात आले असल्यास काय करावे?

ज्या ग्राहकांचे स्मार्ट मीटर आधीच बसविण्यात आले आहेत किंवा मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्यांनी हा संदेश दुर्लक्षित करावा, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

राज्यभर स्मार्ट मीटर मोहीम का राबविली जात आहे?

वीज वितरण व्यवस्था अधिक आधुनिक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. वीज वापराची अचूक माहिती, जलद बिलिंग आणि ग्राहकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे