उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर आता उपराजधानी नागपूर शहराची स्थापना करणारे गोंड राजे बख्त बुलंदशहा यांचे नाव नागपूर नगरीला द्या, अशी मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारने बुधवारी औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव, असे नामांतर करण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यापाठोपाठ काँग्रेसने पुणे शहराचे नाव जिजाऊनगर करण्यात यावे, अशी मागणी केली. तर आदिवासी संघटनांनी नागपूर शहरला बख्त बुलंदशहा नगर असे नामकरण करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात ऑर्गनायजेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र मरसकोल्हे म्हणाले, अलीकडे शहरांची नावे बदलली जात आहेत. राज्याची उपराजधानी नागपूर नगरी आदिवासी शासक व राजे बख्त बुलंदशहा यांनी वसवली होती. त्यामुळे या शहराला बख्त बुलंदशहा नगर असे नाव देण्यात यावे, अशी मागणी आदिवासी समुदाय आणि संघटनांची आहे. या मागणीला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या नागपूर विभागाने समर्थन दिले आहे.