अमरावती: मेळघाटातील टिटंबा येथील शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेतील सुमारे ७० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे. या प्रकरणी ‘सेंट्रल किचन’च्या मालकासह सहा जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आश्रमशाळेच्या अधीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे, तर मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

नेमके प्रकरण काय?

धारणी तालुक्यातील टिटंबा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी रविवारी रात्री जेवण केल्यानंतर त्यांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. पोलिसांनी तत्काळ एक चमू आश्रमशाळेत तर दुसरी चमू टेंभली येथील सेंट्रल किचन या ठिकाणी रवाना करण्यात आली. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकूण ५० मुली आणि १९ मुलांना विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले. धारणी येथील रुग्णालयात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता पाहून धारणी शहरातील आणि लगतच्या गावांतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बोलावून घेण्यात आले. या विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याने त्याच दिवशी विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत रवाना करण्यात आले. केवळ एका मुलीवर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

सेंट्रल किचनच्या मालकाविरुध्द गुन्हा

टिटंबा येथील आश्रमशाळेत टेंभली येथील सेंट्रल किचनमधून शिजवलेल्या अन्नाचा पुरवठा केला जातो. आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरून अखेर पोलिसांनी सेंट्रल किचनचा मालक विजय बोथरे, तेथील प्रतिनिधी सचिन सातपुते, स्वयंपाकी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह एकूण सहा जणांच्या विरोधात बीएनएस तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

बाधित विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ?

मेळघाटातीलच बिजुधावडी, सावलीखेडा, सुसर्दा येथील आश्रमशाळेतील मुला-मुलींना देखील विषबाधा झाल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतली. तेथील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. येथील विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून उपविभागीय पोलीस अधिकारी माधवराव गरूड हे स्वत: तळ ठोकून आहेत. सेंट्रल किचनमधून नऊ आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सकाळचा नाश्ता आणि दोन्ही वेळच्या जेवणाचा पुरवठा केला जातो. त्यातच इतर तीन ठिकाणी देखील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.