यवतमाळ : बहीण-भावाच्या राखीसारख्या पवित्र सणाच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे नेहमी माझ्यावर टीका करतात. मात्र ते स्वतः भावाशी, कार्यकर्त्यांशी, पक्षाशी नातं जपण्यात अपयशी ठरले, अशी टीका यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. त्या यवतमाळ येथे पत्रकारांसोबत बोलत होत्या.
भावना गवळी यांच्या विरोधात ईडीची कारवाई सुरू होती. यादरम्यान मागील वर्षी भावना गवळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली. यानंतर त्यांच्या विरोधात ईडीची कारवाई थांबली, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी नुकताच केला होता. त्यावर भावना गवळी व्यक्त झाल्या. उद्धव ठाकरेंना नाते जपणे म्हणजे काय, हे कळते का, असे गवळी म्हणाल्या. गेल्या २४ वर्षांपासून आपण रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करीत आहोत. मतदारसंघातील हजारो नागरिक तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील लोकांना राखी पाठवत असते. यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांनाही राखी बांधली होती. लालकृष्ण अडवाणी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनासुद्धा राखी बांधत आली आहे. त्यामुळे ईडीची कारवाई व रक्षाबंधन सणाचा काहीही संबंध नाही. मात्र उद्धव ठाकरे स्वतः नातं जपण्यात अपयशी ठरल्यामुळे दुसऱ्यांवर टीका करीत असल्याचा आरोप भावना गवळी यांनी केला.
हेही वाचा – शिंदे, पवार, भाजपाचे आमदार एकमेकांचे कपडे फाडतील – वडेट्टीवार
हेही वाचा – ”राज्यातील महायुतीत नवीन पक्ष नको..”; केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले…
उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्यासोबतसुद्धा नातं टिकवू शकले नाही. पक्षातील आम्ही १३ खासदार तसेच ४० ते ५० आमदार यांच्या सोबतही ते नातं जपू शकले नाही. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला. २०१४ मध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले होते. मात्र आज त्यांच्यावरही टीका करीत आहेत. जे एकनाथ शिंदे खांद्याला खांदा लावून उद्धवजींसोबत काम करीत होते, त्यांच्यावर टीका केली जात आहे. स्वतः नाते जपण्यात अपयशी ठरायचे आणि दुसऱ्यांवर टीका करायची हा मुळात त्यांच्यातील दोष असल्याचा आरोप भावना गवळी यांनी केला.
