Rohit Pal From a Remote Village in Gadchiroli Topped Maharashtra MPSC / गडचिरोली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या वनसेवा परीक्षेच्या निकालात चामोर्शी तालुक्यातील ठाकूरनगर येथील रहिवासी असलेला रोहित पाल या तरुणाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावत सहाय्यक वनसंरक्षक पद मिळवले आहे. विशेष म्हणजे, पहिल्याच प्रयत्नात त्याने हे यश संपादन केले आहे. सोबतच त्याने राज्यसेवा पण उत्तीर्ण केली आहे.
जिल्ह्यातील ठाकुरनगर लहान गावात रोहित पाल यांचे बालपण गेले. लहानपणापासूनच शिक्षणाची आवड असलेल्या रोहितचे वडील सरपंच राहिले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्याने जवळच असलेल्या सुभाषग्राम येथे दहावीपर्यंत शिक्षण घेतले. या काळात शिक्षकांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन त्याला लाभले.
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने वरोरा येथील आनंदवनात प्रवेश घेतला. तेथेही प्रविण्यत प्राप्त केले. अभियांत्रिकी पदवी पूर्ण केल्यानंतर यूपीएससीसाठी तो दिल्लीला गेला. तेथे काही गुणांनी संधी हुकल्यानंतर त्याने लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवले. यात त्याने सामाज कल्याण अधीक्षक, विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी यासारख्या परीक्षा उत्तीर्ण केल्या.
नोकरीत असतानाही त्याने अभ्यास सुरूच ठेवला. यासाठी त्याने पुणे गाठले. अभ्यासातील सातत्य कायम ठेवत त्याने पहिल्याच प्रयत्नात वनसेवेची परीक्षा उत्तीर्ण केली. आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातून तो राज्यात पहिला आला आहे. राज्यसेवेतही उत्तीर्ण होत त्याने दुहेरी यश संपादन केले आहे. त्याच्या यशाने गडचिरोली चे नाव पुन्हा एकदा राज्याच्या पटलावर चमकले आहे.
अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील युवक योग्य मार्गदर्शनाच्या बळावर आणि मेहनतीच्या जोरावर आज यश संपादन करीत असल्याचे सुखद चित्र आहे. रोहितने आपला यशातून अनेकांना यशाचा मार्ग दाखविल्याची भावना शिक्षण वर्तुळातून व्यक्त होत आहे.
