मूलभूत समस्यांबाबत नागरिकांमध्ये नाराजी

नागपूर :  शहरातील विविध भागातील मूलभूत समस्याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत असून महापालिका प्रशासनातील अधिकारी कर्मचारी ऐकत नाही. नगरसेवक आम्ही काय करू असे म्हणून जनतेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात शहरातील अनेक भागात कचऱ्याचे ढीग व अतिक्रमणाची समस्या वाढली असल्याचे चित्र आहे.

महापालिका निवडणुकीला आठ महिन्यांचा कालावधी असून नगरसेवक, उमेदवारीस इच्छुक वस्त्यांमध्ये फिरत असताना नागरिक त्यांना समस्या सांगतात. तेव्हा प्रशासनाकडून कामेच होत नसल्यामुळे नगरसेवक आम्ही काय करू, अशी हतबलता दर्शवत आहेत. त्यामुळे नागरिक समस्यामुळे त्रस्त झाले आहेत. शहरातील विविध प्रभागानिहाय नागरिकांच्या समस्या महापालिका अ‍ॅपवर किंवा नगरसेवकांना सांगितल्या जातात. तरीही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. महाल परिसरात रस्ता रुंदीकरणासाठी दोन्ही बाजूला केलेल्या कारवाईनंतर रस्त्यावरील  मलबा महापालिकेने अद्याप उचलला नाही. शिवाय महाल परिसरात अनेक भागात दिवसेंदिवस कचऱ्याची आणि अतिक्रमणाची समस्या वाढत आहे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. महाल, लकडगंज, सुभेदार लेआऊट, वर्धमाननगर, गोळीबार चौक, इतवारी, रामदासपेठ, गोकुळपेठ, धंतोली, सक्करदरा, वाठोडा, मानकापूर यासह अनेक भागात नागरिकांच्या तक्रारीकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे तेथील मूलभूत समस्या वाढल्या आहेत.

करोनामुळे र्निबधात शिथिलता देण्यात आल्यामुळे शहरात सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. केळीबाग मार्गावर आधीच मलबा पडलेला असताना या मार्गावर छोटय़ा विक्रेत्यांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहे. त्यामुळे रस्त्याने फिरताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. अशाचप्रकारे शहरातील अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचलेले असून  ते दोन-तीन दिवस उचलले जात नाहीत. लोकांच्या घरासमोर कचरा गोळा होऊ लागला आहे.

विशेषत: महाल भागात किल्ला रोड, केळीबाग मार्ग, झेंडा चौक, अयाचित मंदिर, लाकडीपूल, पेटकर गल्ली, नागोबा गल्ली, चितारओळ,  गांधीपुतळा, निकालस मंदिर, मंगळवारी, सक्करदरा नंदनवन, गोकुळपेठ, प्रतापनगर, हुडकेश्वर, रवींद्रनगर, पांडे लेआऊट आदी  परिसरात दोन दोन दिवस सफाई कर्मचारी येत नाही. दाट वस्ती असलेल्या भागात कचऱ्याचे ढीग असतात. अनेक प्रभागात तर काही ठराविक सफाई कर्मचारी काम करताना दिसतात तर काही केवळ जमादारांना दिसणार नाही अशा भागात जाऊन बसतात. अशा सफाई कर्मचाऱ्यांवर झोनमधील अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही.

शहरातील अनेक महिला नगरसेवक प्रभागात गेल्या साडेचार वर्षांत फिरकले सुद्धा नसल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे विशेषत: भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या भागात नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.