नागपूर : अनेक आंदोलक शेतकऱ्यांचे प्राण गेल्यानंतर केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले. त्याप्रमाणे अग्निपथ योजना मागे घेण्यासाठी आंदोलक युवकांचे प्राण जाण्याची प्रतीक्षा करीत आहात काय? असा सवाल शहर काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला. अग्निपथ योजनेच्या विरोधात शहर काँग्रेसने सोमवारी ठिकठिकाणी निदर्शने केली.

आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देवडिया काँग्रेस भवनासमोर आंदोलन झाले. यावेळी विकास ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील आठ वर्षांत शेतकरी, सर्वसामान्य जनता, व्यापारी आणि युवक विरोधी धोरण राबवत आहेत. केंद्राने शेतकरीविरोधी तीन कायदे लागू केले होते. त्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी एक वर्ष आंदोलन केले. यादरम्यान अनेक शेतकऱ्यांचे प्राण गेले. आंदोलन चिघळले आणि त्यानंतर उत्तर प्रदेश, पंजाब व इतर राज्याच्या निवडणुकीच्या तोंडावर कायदे मागे घेण्यात आले.

आता अग्निपथ योजनेला बेरोजगार युवकांचा तीव्र विरोध आहे. विविध राज्यात त्याविरोधात ते आंदोलन करीत आहेत. तेव्हा मोदींनी अग्निपथ योजना त्वरित मागे घ्यावी. आंदोलक युवकांचे प्राण जाण्याची वाट पाहू नये, असेही ठाकरे म्हणाले.