अमरावती : काँग्रेसने राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक बांधणीचे काम हाती घेतले आहे. त्यात तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या या महत्वाच्या मानल्या जातात. यापुर्वी या नियुक्त्यांमध्ये गटातटाचे राजकारण प्रभावी ठरत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यभरातील तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या प्रत्यक्ष मुलाखत घेऊन करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत प्रदेशाध्यक्षांनी स्वत: मुलाखती घेऊन एकूण ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

पक्षात तळागाळात काम करणाऱ्या कार्यक्षम व मेहनती कार्यकर्त्यांना या माध्यमातून महत्वांच्या पदांवर काम करण्यासाठी संधी देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक बांधणी आणि पक्ष कार्याला गती देण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून राज्यभरातील तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या प्रत्यक्ष मुलाखत घेऊन करण्यात येत आहेत.

पक्ष निरिक्षकांनी जिल्ह्यांचे दौरे करून स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून काही नावांची शिफारस प्रदेश काँग्रेसला केली होती. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या निवड समितीच्या मुलाखतींनंतर या नेमणुका करण्यात आल्या आहेत. या निवड समितीत ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद काँग्रेस गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदाी प्रणिती शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील आदींचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही निवड प्रक्रिया अजून सुरु असून उर्वरित तालुक्यांमधील नेमणुका लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, कार्यक्षमतेवर आधारित असून तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या दृष्टिकोनातून राबवण्यात आली आहे. यामध्ये अकोला- ८, बुलढाणा- १९ , चंद्रपूर- २, जळगाव- ८, सिंधुदुर्ग- १, उल्हासनगर- १, रत्नागिरी- ६, ठाणे शहर- ३, ठाणे ग्रामीण- ५, अहिल्यानगर- ३, सांगली- २, पुणे- २, सोलापूर- १, अमरावती- २, धाराशिव- १, जालना- ७, हिंगोली- २, छत्रपती संभाजीनगर- ६, बीड- ३, यवतमाळ- १ अशा नियुक्त्या आतापर्यंत करण्यात आल्या आहेत आणि उर्वरित नियुक्त्यांही लवकरच केल्या जाणार आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.