नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर प्रभागाच्या विकासाच्या बाबतीत त्याच्या अनेक कल्पना होत्या. त्या राबविण्यासाठी तो पुढच्या काळात पुढाकारही घेणार होता. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. नगरसेवक म्हणून कामाला सुरुवात करण्याआधीच तिने त्याचावर झडप घातली आणि त्याच्या सर्व इच्छेवर पाणी फेरल्या गेले. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर अवघ्या सव्वा महिन्यातच नीलेश कुंभारे याच्या अकाली निधनाने सर्वच हळहळले. राजकारणात उच्चशिक्षित तरुणाचा सहभाग तसा कमीच, पण नीलेश त्याला अपवाद होता. पुण्याहून एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर २०१२ मध्ये त्याने महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात उडी घेतली. बहुजन समाज पक्षाकडून लढताना केवळ ४०० मतांनी पराभव झाला. त्यानंतर त्याने ‘उडान’ फाऊंडेशनच्या माध्यमातून कार्य सुरू केले. २०१७ च्या निवडणुकीत भाजप-रिपाइं (अ) युतीचे उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक ३५ मधून निवडणूक लढवली आणि नीलेशची नगरसेवक होण्याची इच्छा पूर्ण झाली. आरोग्य समितीवर त्याची वर्णी लागली. एक उत्कृष्ट नगरसेवक म्हणून नावलौकिक मिळविण्यासाठी त्याच्याकडे अनेक कल्पना होत्या आणि त्या मूर्तस्वरूपात उतरवायच्या होत्या. व्यवस्थापन क्षेत्रातील पदवी असल्याने त्याचे नियोजन तयार होते. नगरसेवक म्हणून नामफलकही त्याने तयार केला होता. तो लावण्याआधीच त्याच्यावर काळाने घाला घातला. निमित्त ठरले साध्या तापाचे. निवडणूक प्रचाराच्या काळातच त्याला ताप होता, पण त्याकडे दुर्लक्ष झाले. निवडून आल्यावर केवळ सव्वा महिन्यात हाच ताप त्याला जगापासून दूर घेऊन गेला. नीलेश १२ दिवसांपासून आजारी होता, मात्र तो नक्की बरा होऊन परतेल आणि नंतर पुन्हा नव्या जोमाने कामाला लागेल, असे त्यांच्या कुटुंबीयांसह त्याच्या मित्रमंडळीलाही वाटत होते. सोमवारी त्याच्या निधनाचे वृत्त धडकताच सर्वानाच धक्का बसला. त्याच्या पार्थिवावर सायंकाळी मानेवाडा स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ व मोठा आप्तपरिवार आहे. अंत्यसंस्काराला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार मिलिंद माने, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे उपस्थित होते.