नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास (नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट) भूखंड घोटाळा प्रकरणात अधिकाऱ्यांवर खापर फोडून व वाटप चुकीचे झाल्याची कबुली देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूखंड वाटप रद्द केले असले तरी कबुली दिल्याने गुन्ह्याचे गांभीर्य संपत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या मुद्दय़ावर राजीनामाच द्यायला हवा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात ‘नासुप्र’च्या भूखंडाचे आणखी काही प्रकरणे बाहरे काढू, असा इशाराही त्यांनी दिला. आव्हाड यांनी रविवारी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी अधिवेशनात गाजत असलेला नासुप्र भूखंड घोटाळा व सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले, एखाद्या मंत्र्यावर किंवा मुख्यमंत्र्यांवर गैरव्यवहाराचा किंवा पदाचा गैरवापर केल्याचा आरोप झाल्यावर नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची महाराष्ट्रात परंपरा राहिली आहे. याबाबत बॅ. ए. आर. अंतुले, शिवाजीराव निलंगेकर, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख आदी मुख्यमंत्र्यांची तर आर.आर. पाटील, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता आदी मंत्र्यांची नावे घेता येतील. यापैकी कोणालाही न्यायालयाने राजीनामा देण्यास सांगितले नव्हते. परंतु आरोप होताच त्यांनी पदत्याग केला. याच पंरपरेचे पालन शिंदे यांच्याकडून अपेक्षित आहे. नासुप्रच्या भूखंड वाटपाबाबत आव्हाड म्हणाले, नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून शिंदे यांनी नासुप्रच्या १६ भूखंडांचे (ज्याचे बाजारमूल्य ८३ कोटी रुपये आहे) वाटप दोन कोटींना केले. तेही प्रकरण न्यायप्रविष्ट असताना न्यायालयाने ताशेरे ओढल्याने ते उघड झाले. त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे. नासुप्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विरोधही डावलण्यात आला. आता मुख्यमंत्री सांगतात की, त्यांना या प्रकरणाची अधिकाऱ्यांनी माहिती दिली नव्हती. पण यासंदर्भातील कागदपत्रावरून भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने नगरविकास खात्याला ही माहिती दिली होती हे स्पष्ट होते. चूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे शिंदे यांच्यावर नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून दिलेले आदेश मुख्यमंत्री म्हणून रद्द करण्याची नामुष्की ओढवली. गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याचे महत्त्व कमी होत नाही. अधिवेशनात दुसऱ्या आठवडय़ात नासुप्रच्या आणखी काही भूखंडांचे गैरव्यवहार बाहेर काढू, असे त्यांनी सांगितले या प्रकरणामागे भाजप किंवा ठाण्यातील स्थानिक राजकारणाचा संबंध आहे का, असा सवाल आव्हाड यांना केला असता ते म्हणाले, भाजपचा संबंध आहे किंवा नाही हे माहिती नाही. मात्र मुख्यमंत्र्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाने भाजपचे काही आमदारही अस्वस्थ आहेत, असे ते म्हणाले. ‘मित्रा’साठी मित्राला न्याय.. केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या धर्तीवर राज्यात स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र इन्स्टिटय़ूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ (मित्रा) संस्थेच्या उपाध्यक्षपदी अजय आशर या बांधकाम व्यावसायिकाच्या नियुक्तीवर आव्हाड यांनी टीका केली. अशा संस्थांवर आतापर्यंत गैरराजकीय व विविध क्षेत्रांतील बुद्धिवंतांची नियुक्ती करण्याचा प्रघात आहे. पण शिंदे यांनी आशर यांची नियुक्ती करून ही परंपरा खंडित करत मित्राला न्याय दिला आहे. जुने एकनाथ शिंदे हवेत.. एकनाथ शिंदे १९८५ पासून ठाण्याच्या राजकारणात आहेत. सर्वाना मदत करणारा व सोबत घेऊन चालणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर ते सुडाचे राजकारण करू लागले. या सुडाग्नीत ते स्वत: गुरफटत जातील. त्यामुळे आम्हाला जुनेच एकनाथ शिंदे हवे आहेत, त्यासाठी प्रार्थना करीत आहोत, असे आव्हाड म्हणाले.