नागपूर: जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला आहे. मध्यरात्री दीडच्या सुमारास भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तब्बल ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या मोहिमेला भारताने ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलंय. दरम्यान, या प्रत्युत्तरानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे म्हणाले, पहलगाम मधील पीडित लोकांना न्याय मिळणे सुरू झाले आहे. ”ऑपरेशन सिंदूर” न्याय मिळाला. राष्ट्राचे समर्थन. जय हिंद. भारत माता की जय । अशा शब्दांत या कारवाईचे स्वागत केले आहे.
मंगळवारी मध्यरात्रीनंतर म्हणजेच साधारणपणे दीडच्या सुमारास भारतीय हवाई दलाच्या फायटर जेट्स आणि राफेल विमानांनी पाकिस्तानमधील एकूण ९ ठिकाणी दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. यात मोठ्या प्रमाणावर या दहशतवादी तळांचं, दहशतवाद्यांच्या मनुष्यबळाचं आणि दहशतवाद्यांना मदत देणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेचं मोठं नुकसान भारतानं केल्याचं स्पष्ट झालं आहे.
कोणत्या ९ ठिकाणांना केलं लक्ष्य?
दरम्यान, भारतानं कोणत्या ९ ठिकाणी असणाऱ्या दहशतवादी तळांना लक्ष्य केलं, याची यादी समोर आली आहे.
१) बहावलपूर २) मुरिदके ३) गुलपूर ४) भीमबर ५) चकअमरु ६) बाग ७) कोटली ८) सियालकोट ९) मुजफ्फराबाद
अशी ती ९ ठिकाणं आहेत. या ठिकाणी जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या तीन दहशतवादी संघटनांचे तळ होते. या ठिकाणी मोठ्या संख्येनं दहशतवादी असल्याची माहिती भारतीय लष्कराकडे होती. त्यानुसार सुनियोजित पद्धतीने फक्त याच ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्यात कोणत्याही सामान्य पाकिस्तानी नागरिकाला लक्ष्य करण्यात आलेलं नाही. तसेच, पाकिस्तानी लष्कराच्या तळावरदेखील हल्ला केलेला नाही.