नागपूर : राज्यात अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून सर्वाधिक मुली नागपुरातून बेपत्ता झाल्या आहेत. उपराजधानीतून गेल्या १५ महिन्यांत १२ ते १७ वर्षे वयोगटातील ४७१ मुलींनी घरातून पलायन केले. तसेच १२१ अल्पवयीन मुलेसुद्धा बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांकडे आहे. मुलींच्या बेपत्ता होण्यामागे प्रेमप्रकरण हे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणात देशात महाराष्ट्र राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. भारतात सर्वाधिक मुली महाराष्ट्रातून बेपत्ता होत असल्याची नोंद एनसीआरबीकडे आहे. तसेच विवाहित महिलासुद्धा बेपत्ता होण्याच्या प्रमाणात महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे महाराष्ट्रातून अल्पवयीन मुली, विवाहित महिला, विधवा, घटस्फोटीत महिलांच्या बेपत्ता होत असल्यामुळे मोठी सामाजिक समस्या निर्माण झाली आहे.
वयाच्या १२ ते १७ वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुली शारीरिक आकर्षणातून प्रेमात पडतात. भविष्याचा विचार करण्याची फक्त प्रेमासाठी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतात. अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. नागपुरातून वर्ष २०२४ मध्ये ३७० अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी ३६७ मुलींचा शोध पोलिसांनी घेतला. वर्ष २०२५ मध्ये जानेवारी ते मार्च या महिन्यांत नागपुरातून १०१ मुलींनी घरातून पलायन केले. त्यापैकी ८१ मुलींचा पोलिसांनी शोध घेऊन कुटुंबियांच्या स्वाधीन केल्या आहेत. अद्यापही २० अल्पवयीन मुली बेपत्ता असल्याची नोंद पोलिसांकडे आहे.
प्रेमप्रकरण मुख्य कारण
अल्पवयीन मुलींंचे घरातून पलायन करण्यामागे प्रेमप्रकरण हेच मुख्य कारण समोर आले आहे. काही मुली परराज्यात किंवा त्यांना देहव्यापारात ढकलल्यामुळे अशा मुलींचा शोध लागत नाहीत. नोकरीचे आमिष, झटपट पैसे कमविण्याचा नाद किंवा प्रेमाच्या जाळ्यात अडकून सर्वाधिक अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.
बेपत्ता झालेल्या मुलींची आकडेवारी
वर्ष | बेपत्ता मुली |
२०२१ | ३५४ |
२०२२ | ३७९ |
२०२३ | ३८५ |
२०२४ | ३७० |
२०२५ | (मार्च) – १०१ |
अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यास आम्ही गांभीर्याने शोध घेतो. त्यामुळेच सर्वाधिक मुलींचा शोध लावण्यात आला. बेपत्ता मुली-महिलांच्या शोधासाठी सध्या ‘ऑपरेशन शोध’ राबविण्यात येत आहे. ललिता तोडासे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा)