सोनेगाव परिसरातून बेपत्ता झालेल्या युवकाचा चाकूने भोसकून खून झाला. त्याचा मृतदेह सोमवारी सकाळी ७ वाजता जयताळा बाजार परिसरात आढळून आल्याने एकच खळबळउडाली. भोजराज रामेश्वर डोमडे (३०) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी नाल्यात एका युवकाचा मृतदेह पडून असल्याची माहिती प्रतापनगर पोलिसांना मिळाली. मृतदेहाची ओळख पटल्यावर तो भोजराम डोमडे असून तो सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याची माहिती मिळाली. तान्हा पोळ्याच्या रात्री दहा वाजता भोजराजचे अज्ञात आरोपीने अपहरण केले. त्याचा सोनेगावाच्या हद्दीत चाकूने भोसकून खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जयताळा बाजारातील नाल्यात फेकून दिले. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सोनेगाव पोलिसांचा हलगर्जीपणा? –

सोनेगाव पोलीस ठाण्यात भोजराजची पत्नी ममता हिने पती बेपत्ता झाल्याची माहिती दिली. पोलिसांनी भोजराजच्या शोधासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, असा आरोप केला जात आहे. जर पोलिसांनी त्वरित हालचाल केली असती तर त्याचा जीव वाचला असता. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा जीव गेल्याची देखील चर्चा परिसरात आहे.