यवतमाळ : शेतीचा खर्च, निसर्गाची अवकृपा, कर्जबाजारीपणा या दुष्टचक्रात अडकलेले शेतकरी व शेतमजूर यांच्यासह कामगार आदी वंचित घटकातील १०८ उपवर, वधू उद्या रविवारी, ११ मे रोजी एकाच वेळी, सर्वधर्मीय समाजासाठी असलेल्या एकाच मंचावरून सहजीवनाचा नवा अध्याय सुरू करणार आहे. हलाखीच्या परिस्थितीतही आपल्या मुला-मुलींच्या आयुष्यात आनंदाची पेरणी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पालकांसाठी येथील ‘श्री सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा’ हा एक आशेचा किरण ठरला आहे.
श्री सत्यसाईबाबा यांच्या शत जयंतीनिमित्त ११ मे रोजी सायंकाळी ६.४५ वाजता, जाम बायपासवरील हॉटेल वेनिशियन येथे हा सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळावा होणार आहे. या वर्षी मेळाव्यात १०८ जोडपी त्यांच्या त्यांच्या धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे लग्न बंधनात अडकणार आहे. हा सामूहिक विवाह मेळावा समर्पण, सेवा, धार्मिक ऐक्य आणि सामाजिक बांधिलकीचा महोत्सव ठरत आहे. यावर्षीच्या सोहळ्यात बेंगळुरू येथील द्वारकानाथ स्वामी, माजी केंद्रीय मंत्री तथा मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उइके, खासदार संजय देशमुख, आमदार बाळासाहेब मांगुळकर, जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम मोरे महाराज, तसेच ह. भ. प. माणिकराव मोरे महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
३१ वर्षांपूर्वी १९९४ पासून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे आतापर्यंत हजारो कुटुंबांना आधार मिळाला आहे. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन आदी विविध धर्मीय पारंपरिक विवाहपद्धतींना एकाच मंचावर स्थान देत हा सोहळा धार्मिक ऐक्याचा संदेश देत आहे. यवतमाळात सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याची ही परंपरा येथील सतचिकित्सा प्रसारक मंडळाचे डॉ. प्रकाश नंदूरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केली. हीच महाराष्ट्रातील सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याची सुरुवात ठरली, असे सांगण्यात येते. पुढे सामाजिक न्याय विभागानेही सरकारी पातळीवर सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळावे सुरू केले. यवतमाळात सतचिकित्सा प्रसारक मंडळ, यवतमाळ आणि हृदय स्पंदना साई माई ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे. नंदूरकर परिवार, विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, संघटना आदींच्या सामूहिक प्रयत्नातून दरवर्षी मे महिन्यात श्री सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडतो व सर्व खर्च केला जातो.
या उपक्रमात विवाहासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आणि आर्थिक संकटात असलेल्या कुटुंबातील मुलामुलींना प्राधान्य देण्यात येते. विवाहप्रसंगी वधूवरांसाठी कपडे, मंगळसूत्र, संसारोपयोगी भांडी, तसेच प्रत्येक जोडप्याच्या वऱ्हाडातील ७० जणांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येते. प्रत्येक विवाह संबंधित धर्माच्या परंपरांनुसार विधिपूर्वक पार पाडले जातात. याशिवाय, आवश्यक कागदपत्रे पूर्ण करणाऱ्या जोडप्यांना शासनाच्या कन्यादान योजनेचाही लाभ दिला जातो. यावर्षी विवाहबंधनात अडकणाऱ्या जोडप्यांसाठी ही सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.
या आयोजनामध्ये डॉ. प्रकाश नंदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अजय मुंदडा, प्रकाश जाजू, सचिन जीरापुरे, प्रमोद बाविस्कर, कृपाल नेटके, पूनम जाजू, नीलिमा मंत्री, ज्योती बाविस्कर आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
सामाजिक समरसतेचा सुवर्ण अध्याय लिहिणाऱ्या श्री सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यामुळे केवळ १०८ नवदाम्पत्यांची आयुष्ये उजळण्यासोबतच समाजालाही माणुसकीचा, एकतेचा आणि संवेदनशीलतेचा संदेश मिळणार आहे.डॉ. प्रकाश नंदूरकर आयोजक