राज्यात शिंदे-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर शिंदे यांना पाठिंबा देणारे शिवसेनेतील आमदार, खासदार चांगलेच सक्रिय झाले आहेत. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने त्यापैकीच एक आहे. काल (शुक्रवार) झालेल्या कृषी विभागाच्या आढावा बैठकीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आग्रही भूमिका मांडताना खासदार कृपाल तुमाने यांनी मदत वाटपासंदर्भात असलेले सर्व निकष व कार्यपध्दतीच गुंडाळून ठेवण्याची अजब मागणी थेट कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली.

हे देखील वाचा – भंडारा : ‘देव तारी त्याला कोण मारी’; नदीपात्रात नाव उलटली तरी सहा जण बचावले!

ते म्हणाले, “ अतिवृष्टीग्रस्तांना मदत करताना पंचनामे करू नये हा वेळखाऊ (टाईमपास) प्रकार आहे. पंचनामे करताना प्रशासनाकडून वेगवेगळी कारणे दिली जात आहेत. सर्वच ठिकाणी प्रशासन पोहचू शकत नाही, ठराविक वेळात एवढ्या मोठ्या क्षेत्राचा सर्वे करणे कठीण आहे. यामुळे कोणत्याही सर्वेक्षणाच्या भानगडीत पडू नये सरसकट मदत जाहीर करावी. ”

हे देखील वाचाअमरावती : मद्यधुंद शिक्षकाचा प्रताप, विद्यार्थ्यांना घरी पाठवले अन् वर्गातच केले ‘निद्रासन’

तसेच, त्यांनी पीक विम्याच्या अटींमध्ये सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली. याशिवाय, याबाबत आपण पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांना पत्र लिहून मागणी करणार आहोत, अशी देखील माहिती पत्रकारांशी बोलताना खासदार तुमाने यांनी दिली.