नागपूर : नागपूर शहरातील प्रमुख रेल्वे स्थानकांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी सालवा ते बुटीबोरीदरम्यान नवीन फ्रेट बायपास रेल्वे मार्ग उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सुमारे ५१.४५ किलोमीटर लांबीचा हा मार्ग महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) उभारणार असून प्रकल्पाची अंदाजित किंमत १४४० कोटी रुपये आहे.
हा बायपास दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या गोंदिया–नागपूर विभागातील सालवा स्थानकाला मध्य रेल्वेच्या नागपूर–वर्धा मार्गावरील बुटीबोरी स्थानकाशी थेट जोडणार आहे. परिणामी, नागपूर, अजनी, इतवारी, गोधनी आणि कळमना या स्थानकांमधून सध्या होणारी मालगाड्यांची गर्दी टाळता येणार आहे.
मध्य भारतातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन म्हणून नागपूरची ओळख आहे. शहरातील रेल्वे जाळे अत्यंत गुंतागुंतीचे असून विविध मार्ग येथे एकमेकांना छेद देतात. या मार्गांवरून प्रवासी गाड्यांसह मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक केली जाते. विशेषतः खापरखेडा, मौदा आणि कोराडी येथील औष्णिक वीज प्रकल्पांसाठी लागणाऱ्या कोळशाची वाहतूक याच मार्गावर अवलंबून आहे. त्यामुळे हा विभाग देशातील सर्वाधिक रेल्वे वाहतूक हाताळणाऱ्या भागांपैकी एक मानला जातो.
सध्या मेल, एक्स्प्रेस आणि प्रवासी गाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याने मालगाड्यांना वारंवार थांबावे लागते. परिणामी कोळसा वाहतुकीत विलंब होऊन वीज प्रकल्पांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण होते. नागपूरकडे येणाऱ्या प्रमुख मार्गांवर तिसरी रेल्वे लाईन उभारण्याचे काम सुरू असले, तरी शहर परिसरात स्वतंत्र ‘थ्रू लाईन’ उभारणे जागेअभावी शक्य नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
याच पार्श्वभूमीवर फ्रेट बायपासचा प्रस्ताव पुढे आला आहे. नव्या मार्गामुळे शहरातील यार्डवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. मालगाड्या थेट वळवता आल्याने त्यांचा धावण्याचा कालावधी कमी होईल आणि इंधन बचतही साध्य होईल. यामुळे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीला (महाजेनको) दरवर्षी मोठ्या प्रमाणावर आर्थिक बचत होण्याची अपेक्षा आहे.
याशिवाय, नागपूर परिसरात उपनगरीय रेल्वे सेवा वाढविण्यासाठी अधिक मार्ग उपलब्ध होतील. ईएमयू गाड्यांच्या फेऱ्या वाढविता येतील आणि प्रवासी गाड्यांची वक्तशीरता सुधारेल.
एकूणच, वाढत्या रेल्वे वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर सालवा–बुटीबोरी फ्रेट बायपास प्रकल्प नागपूरच्या रेल्वे व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असून माल व प्रवासी वाहतुकीतील समतोल साधण्यास मदत करणार आहे.

